मुंबई18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी जालन्याच्या आंतरवाली सराटीत गत 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. त्यातच एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाने या आंदोलनावर शंका उपस्थित करत या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची पार्श्वभूमी तयार केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मराठा आंदोलनामुळे राज्य सरकार बॅकफूटवर फेकले गेले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी हा संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामा घेण्याची पार्श्वभूमी तयार करणारा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
काय म्हणाले असीम सरोदे?
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यासाठी आणि मागण्यासाठी पार्श्वभूमी व कारणे तयार केली जात आहेत का? कारण आरक्षण हा विषय तर राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच संविधानिक सुधारणा केली पाहिजे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय झालाय हे दुर्दैव, असे असीम सरोदे बुधवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले.
अजित पवारांच्या सरकारमधील सहभागापासून चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. त्यातच असीम सरोदे यांनी ही शंका व्यक्त केल्यामुळे या अटकळींचा बाजार चांगलाच गरम झाला आहे.
दुसरीकडे, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी आंतरवाली सराटीत जावून मुख्य उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. पण जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे या शिष्टमंडळाला आल्यापावली परत फिरावे लागले.