भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असे ज्याचे वर्णन होते, तो आजचा दिवस. १९७५ मध्ये याच दिवशी रात्री उशीरा तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली व सर्वांच्या मूलभूत हक्कांवरच घाला घातला.
आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता.
या काळात तेव्हाच्या इंदिराजींनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.
तेव्हाचे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी राज्य घटनेच्या कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या.
इंदिरा गांधींच्या विरोधात असलेले जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.
मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले कॉंग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.
आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते. यापासून धडा घेऊन भविष्यात अशी आणीबाणी लावता येणार नाही, अशी तजवीज करणारी घटनादुरुस्ती संसदेने मंजूर केली.
(भारतकुमार राऊत यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार)