हिंगोली3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर चिंचाळा पाटील जवळ अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी रविवारी रात्री सात वाजता महामंडळाची बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.
4-5 जण आले अन् पेट्रोल टाकून एसटी पेटवली !
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती आगाराची अमरावती ते नांदेड ही बस आज रात्री सात वाजता हिंगोली ते कनेरगाव मार्गावर चिंचाळा पाटील जवळ पंक्चर झाली. त्यामुळे चालक व वाहकाने बसमधील प्रवाशांना इतर बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर बसचे पंक्चर काढत असताना पाठीमागून आलेल्या चार ते पाच जणांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. त्यानंतर पाचही जणांनी तेथून पळ काढला.
पोलिस घटनास्थळी दाखल, 30 लाखांचे नुकसान
दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस चालक व वाहक घाबरून गेले. दोघेही तातडीने बसच्या बाजूला निघून गेले. या प्रकारची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मगन पवार, अशोक कांबळे यांना घटनास्थळी रवाना केले.
हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अग्निशामक दल विभाग प्रमुख बाळू बांगर यांनी तातडीने अग्निशामक दल रवाना केले. अग्निशामक दलाने बसला लागलेली आग विझवली मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. घटनास्थळी हिंगोली आगाराचे वाहन निरीक्षक एफ.एम. शेख यांच्या पथकाने भेट दिली असून यामध्ये एसटीचे 30 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून बस चालणाऱ्या पाच जणांचा शोध सुरू केला आहे