2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय जनता सद्या विचित्र प्रकारचे राजकारण करत आहे. कारण नसताना इंडिया आणि भारत असा वाद सुरू केला आहे. कारण नसताना सत्ताधाऱ्यांकडून लोकांचं मन विचलित करण्याचं कामं सुरू आहे. समाजातील महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला हवं तसं वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
निवडणुकीसाठी कामाला लागा
शरद पवार हे मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कारण नसताना हवं तसे वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करु लागले आहेत. परंतु याकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. लोकांमध्ये जाऊन सांगावे लागेल. येणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरायचे आहे. सर्वांनी कामाला लागा. जे वेगळी भूमिका घेऊन बाहेर पडले आहेत. त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादी पक्षात स्थान नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी बंडखोर आमदार तथा नेत्यांना केला.
G20 परिषदेत प्रदर्शन, मोदींवर घणाघात
शरद पवार म्हणाले की, इंडिया किंवा भारत या विषयात घटनेच्या पहिल्या वाक्यात यासंबंधीचे स्पष्टीकरण केलेले आहे. तरी देखील सत्ताधारी अशा प्रकारचे राजकारण करत आहेत. आज दिल्लीत विविध देशांचे प्रमुख आलेले आहेत. त्यांचे स्वागत करणे हे आपल्या देशाचे कर्तव्य आहे, ते आम्हाला मान्यच आहे. मात्र, त्यांच्यासाठी चांदीचे ताट, सोन्याचे ताट असे कधी झाले नाही. परंतू ज्या पद्धतीने त्यांचे प्रदर्शन केले जात आहे. त्यातून येणाऱ्या 2024 च्या निवडणूकीसाठी कसा फायदा होईल. असाच विचार दिसून येतो, असे म्हणत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला.
मग गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणणार
शरद पवार कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले की, इंडिया या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती योजना काढल्या आहेत? तेव्हा हे का सूचले नाही. केवळ राजकारण व मुळ विषयाकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे षडयंत्र आहे. किती ठिकाणी केंद्रसरकार बदल करणार आहे. आता गेट वे ऑफ इंडिया? ला काय म्हणणार, असा सवाल देखील उपस्थित केला.
जे गेलेत त्यांना NCPचे दरवाजे बंद
जे लोक वेगळी भूमिका स्विकारून आपल्यातून सोडून गेलेत. दुसऱ्या पक्षाच्या अधिन झालेत. अशा लोकांना आता राष्ट्रवादीत स्थान नाही. असा इशारा देखील शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. त्यांनी सुमारे एक तास मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित केले.