सुनावले: काय रिवाईज करायचे ते सांगू नका आधी गावाला टँकरने पाणी द्या; आमदार श्रीकांत भारतीय यांनी अधिकाऱ्यांना खडसावले


हिंगोली16 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लक्ष्मणनाईक तांडा गावात पाण्यासाठी नळ योजनेचे कोणते काम रिवाईज करायचे, कधी योजना सुरु करणार ते सांगू नका आधी गावाला टँकरने पाणी पुरवठा करून गावाचा पाणी प्रश्‍न सोडवा अन तातडीने नळ योजनेचे काम सुरु करा अन्यथा त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील अशा शब्दात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी ता. २४ खडसावले.

Advertisement

औढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मणनाईकतांडा येथील पाणी प्रश्‍न लक्षात घेऊन आमदार भरतीया यांनी आज गावाला भेट दिली. यावेळी भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, ॲड. शिवाजी जाधव, सरपंच ज्योती रवींद्र पवार, रवींद्र पवार यांच्यासह पदाधिकारी, गावकरी व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार भरतीया यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीची पाहणी केली. मात्र विहीरीने तळ गाठल्याचे दिसून आले. गावात पाण्यासाठी टँकर देखील मंजूर नाही शिवाय नळ योजनेचे कामही झाले नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्यानंतर आमदार भरतीय संतप्त झाले. यावेळी त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Advertisement

गावात नळ पाणी पुरवठा योजना का मंजूर नाही, सध्या गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु असतांना टँकर का सुरु केले नाही या प्रश्‍नावर अधिकारी निरुत्तर झाले. गावातील पुर्वीचे नळ योजनेचा रिवाईज करून नवीन योजना तयार केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र काय रिवाईज करायचे, काय नाही हे मला सांगू नका, गावातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने एका टँकरने पाणी पुरवठा सुरु करा. त्यानंतर आठ दिवसांत नळ योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा. मात्र नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे गावकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, आता गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु होणार असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.



Source link

Advertisement