सातारा15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लेह लडाख येथे वाहन अपघातात वीर मरण प्राप्त झालेल्या वैभव संपतराव भोईटे (वय – 23, रा. भोईटे वस्ती, राजाळे, ता. फलटण) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रुपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटूंबीयांनी केलेला आक्रोश पाहुन अनेकांना अश्रु आनावर झाले. भोईटे यांना वडिल संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दिड वर्षाची मुलगी हिंदवी यांनी भडाग्नी दिला.
संपूर्ण फलटण तालुक्यावर पसरली शोककळा
लडाखमधील लेह जिल्ह्यात राजधानी लेह जवळ कॅरी गावातुन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जवानांचा मृत्यू झाला होता. या शहीद झालेल्या जवानांमध्ये राजाळे ता. फलटण येथील वैभव संपतराव भोईटे (वय 23) या जवानाचा समावेश असल्याचे वृत्त फलटण तालुक्यात व राजाळे या गावी समजताच संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. सोमवारी राजाळे गावाने संपुर्ण बाजार पेठ बंद ठेवून व नागपंचमीचा सण साजरा न करुन श्रध्दांजली वाहिली. हुतात्मा वैभव भोईटे यांचे पार्थीव लेहवरुन दिल्ली, हैद्राबाद मार्गे पुणे येथे विमानाने आणण्यात आले. पुणे येथुन विशेष वाहनातुन राजाळे येथे आणण्यात आले. लोणंद ते फलटण व फलटण ते राजाळे या मार्गावरील प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. गावोगावी भोईटे यांना श्रध्दांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले होते.
‘अमर रहे, अमर रहे’ घोणषांनी आसंमत निनादला
राजाळे येथे भोईटे यांच्या पार्थीवाचे आगमन सायंकाळी आठ वाजता झाले. तेथुन भोईटे वस्ती येथे फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतुन साडे आठच्या सुमारास निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी वीर जवान वैभव भोईटे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सुरज चाँद रहेगा वैभव तेरा नाम रहेगा, इनक्लाब जिंदाबाद आशा घोषणांनी आसमंत निनादला. राजाळे गावातून भोईटे वस्ती येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थीव मुख दर्शनासाठी आणल्यानंतर त्यांची आई, वडिल, पत्नी व कुटूंबियांनी हंबरडा फोडला त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी उपस्थित हजारो लोकांनाही अश्रु अनावर झाले होते. भोईटे यांच्या निवासस्थानापासुन नजिक असणाऱ्या मोकळ्या पटांगणावर वीर जवान भोईटे यांचे पार्थीव ठेवण्यासाठी फुलांनी सजविलेले विशेष स्टेज करण्यात आले होते. तेथे हजारोंच्या जनसमुदायाने त्यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले.
राजाळे गावातील फोटो….
या अधिकारी, कर्मचारी व राजकीय नेत्यांची उपस्थिती
यानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परीषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यावतीने प्रांत अधिकारी सचिन ढोले, पोलिस उपअधिक्षक राहूल धस, राजाळे सरपंच सौ. स्वाती दोंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसो काळे, निवृत्त सनदी आधिकारी विश्वासराव भोसले, जिल्हा सैनिक मंडळ, कमांडींग अॉफिसर ३११ मेडियम रेजिमेंट, कमांडींग आॉफिसर 24 मराठा, कर्नल अॉफ दि रेजिमेंट मराठा, जी ओसी महाराष्ट्र ॲन्ड गोवा, जी ओसी डी एम ॲन्ड जी एस एरीया, जीओसी इन सी हेडक्वार्टर साऊथर्न कमांड, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, मेकनाईझ रेजिमेंटच्या अधिकार्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली.
यानंतर पोलिस प्रशासन व सैन्य दलाच्यावतीने प्रत्येकी तिन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. यानंतर ज्या तिरंग्यात लपेटून वैभव यांचे पार्थीव आणण्यात आले तो तिरंगा त्यांच्या कुटूंबियांना सुपुर्द करण्यात आला. यानंतर त्यांच्या पार्थीवास वडिल संपतराव भोईटे यांनी व कडेवर बसलेल्या दिड वर्षाची मुलगी हिंदवी यांनी भडाग्नी दिला. यावेळी आजी माजी सैनिक संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व सेवाभावी संघटनांचे प्रतिनिधी फलटण तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपघातापूर्वी आईला केला होता फोन
वैभव भोईटे यांनी शनिवारी पहाटे चार वाजता आईला फोन केला होता व आपण लेह लडाकला मोहिमेसाठी निघालो असल्याचे सांगत तुझी आठवण आल्याने इतक्या पहाटे फोन केल्याचे सांगितले. सदर बोलने झाल्यानंतर अवघ्या काही तासातच लष्करी वाहनाच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली व त्यामध्ये भोईटे यांना वीर मरण प्राप्त झाले.