सातारा | प्रतिनिधी30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावच्या हद्दीत आयशर टेम्पोने मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोतील तीन जण जागीच ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला आहे. या अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील आहेत.
टेम्पोचा चक्काचूर
चिकमंगळूरहून मुंबईकडे निघालेल्या मालट्रकचा टायर फुटल्याने ट्रक महामार्गाच्या कडेला मोटे वस्तीसमोर उभा होता. टायर बदलल्यानंतर चालकाने ट्रक सुरू केला. त्यानंतर ट्रक रस्त्यावर नेत असतानाच आयशर टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघतातात टेम्पोतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, मालट्रकमध्ये घुसल्यामुळे आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला. पोलिस आणि शिरवळ रेस्क्यू टीमने क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने टेम्पो बाजूला काढला.
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिरवळ रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले. त्यानंतर क्रेन आणि जेसीबी आणून मालट्रकमध्ये घुसलेला टेम्पो बाजूला काढण्यात आला.
नागरिकांची घटनास्थळी धाव
कर्नाटकातून पुण्याकडे निघालेल्या आयशरमध्ये स्वत: मालकासह अन्य एक चालक आणि क्लिनर, असे तिघेजण होते. अपघातावेळी स्वत: मालकच टेम्पो चालवत होता, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या भरधाव आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. अपघातात तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. सकाळी मृताचे कुटुंबीय शिरवळमध्ये दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.