मुंबई12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मनोज जरांगे पाटील यांनी आज तब्बल 17 दिवसानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तोच काही तासानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. सरसकट कुणबी दाखला देऊ नये, ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, अशी भूमिका मांडत त्यांनी सरकारला सूचना दिली आहे. यावेळी राणे यांनी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन देखील केले.
कलम 15/4, 16/4 चा अभ्यास करावा
नारायण राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी जुनीच आहे. याआधी 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. पण, कोर्टात प्रकरण गेल्याने आरक्षण टिकलं नाही. मराठा आरक्षणाबाबत काहींनी टीका केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी होत आहे. मला याबाबत वाटतं की सरसकट असं आरक्षण देऊ नये. हा निर्णय घेताना सरकारने घटनेतील कलम 15/4 आणि 16/4 नुसार याचा अभ्यास करावा, असे राणे म्हणाले आहेत.
गरीब आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र द्या
नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं. सरसकट कुणबी दाखला हे 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे सरसकट याचा विचार करण्यापेक्षा घटनेतील तरतुदीनुसार मराठा समाजातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दुर्बल घटकांचा अभ्यास व्हावा. महाराष्ट्रात 38 टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली आहे.
कोणाचं काढावं कोणाला द्यावं, या मताचा नाही
कोणत्याही जातीबाबत कोणाचं काढावं आणि कुणाचं घ्यावं अशा मताचा मी नाही. त्यामुळे घटनेतील तरतूदीप्रमाणे आरक्षण देण्याचा अभ्यास सरकारने करावा. समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकराला आहे. त्याप्रमाणे आरक्षण देण्यात यावेत, असं राणे म्हणाले.
हे ही वाचा सविस्तर
उपोषण मागे, न्याय केव्हा?:आता जरांगे पाटलांचा लढा कोणत्या दिशेने जाणार? ठराविक मुदतीत न्याय मिळाला नाही तर पुढे काय होणार?
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आपल्या मागण्या हे सरकार पूर्ण करतील ही आमची अपेक्षा आहे. तर आम्ही पुन्हा अधिकचे दहा दिवस वाढून देतो. पण न्याय द्या, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. आता उपोषण सुटले पण आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याबाबत जाणून घेऊया… – येथे वाचा संपूर्ण बातमी