ऋषिकेश श्रीखंडे | छत्रपती संभाजीनगर16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
समृद्धी महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या आठ नवनगरांपैकी एक नवनगर केंद्र सरकार स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत उभारणार आहे. यासाठी सरकार एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. केंद्रीय पथकाने नुकतीच नागपूर जिल्ह्यातील विरूळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील सावरगाव माळ ठिकाणची पाहणी केली असून या पाहणीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. या दोनपैकी एक ठिकाण केंद्र सरकार निवडणार आणि त्या ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत १ हजार कोटी खर्च करून नवनगर उभारणार आहे.
यासंदर्भात पथकाची व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय पथकाचे अधिकारी निवासचारी, मयुरी इस्लावत व एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची उपस्थिती होती.
१ नवनगर केंद्र सरकार उभारणार
समृद्धी महामार्गाच्या कडेला आठ ठिकाणी नवनगरे उभारली जाणार आहे. यापैकी एक नवनगर हे केंद्र सरकार स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत उभारण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथकाने नुकतेच दोन ठिकाणची पाहणी केली असून यापैकी विरूळ येथे केंद्र सरकार नवनगर उभारेल. यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी दिली.
५०० कोटी रुपये खर्चाच्या नवनगरात उद्योग, बगिचे…
औद्योगिक ठिकाण, बगिचे आणि खेळाचे ठिकाण, शिक्षणाच्या जागा, रुग्णालय, दुकाने आणि शॅापिंग सेंटर, रहिवासी ठिकाण हे नवनगरात असेल. एका नवनगरासाठी १ ते ४ हजार एकर जमीन अपेक्षित आहे. जमिनीचा शोध सुरू आहे. एका एकरमध्ये नवनगर स्थापन करायचे असल्यास ५०० कोटींचा खर्च लागेल.