आरसीबी ने आतापर्यंत आयपीएलचा एकंही खिताब पटकावलेला नाही. २००८ पासून आरसीबीची कमान विराट कोहलीकडे असूनही या संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल आलं की आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा असते की, यंदातरी आपल्या टीमने ही स्पर्धा जिंकावी. या संघाच्या खेळाडूंची देखील अशीच भावना आहे. मात्र यावर्षी जरी आरसीबी ने हा खिताब जिंकला तरी आनंद होणार नसल्याचं मोठं विधान आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने केलं आहे.
याचसंदर्भात विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला. यावर विराट कोहली म्हणाला, माझ्यासोबत यंदा एबी डिव्हिलियर्स नाहीये, आम्ही जवळपास १० वर्षे एकत्र खेळलो. जर फाफेने (आरसीबीने) येत्या हंगामामध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली तर त्यांना फार आनंद होणार नाही. त्यावेळी मी एबी डिव्हिलियर्सचाच विचार करेन. कारण आम्ही दोघांनी एकत्र आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विचार केला होता.
एबी डिविलियर्सने निवृत्ती घेतल्याचा विराटला धक्का
विराट पुढे म्हणाला, ते खूप विचित्र होतं, म्हणजे मला स्पष्टपणे आठवतंय की, शेवटी त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्याने मला एक व्हॉईस नोट पाठवली होती की. त्यावेळी मी विश्वचषकानंतर दुबईहून परत येत होतो. घरी परतत असताना मला एबी डिव्हिलियर्सची व्हॉइस नोट मिळाली. त्यावेळी मला फार धक्का बसला होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली डिव्हिलियर्स आरसीबीकडून बरीच वर्ष खेळला. आयपीएल या हंगामाच्या सुरुवातीला त्याने निवृत्ती जाहीर केली होती. शिवाय विराट कोहलीने देखील त्याचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या १५व्या हंगाममध्ये फाफ डु प्लेसिस कर्णधार आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीला पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलाय. तर आता पुढचा सामना आरसीबी बुधवारी केकेआर विरूद्ध खेळणार आहे.