जम्मू22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.
आज पहाटेच संजय राऊत राहूल गांधींसह यात्रेत सहभागी झाले. यात्रेत सहभागी होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे यात्रेत स्वागत केले.
आज दुपारी संजय राऊत पाकव्याप्त काश्मीरमधील शिष्टमंडळ तसेच, शिख समुदायाच्या शिष्टमंडळाशी भेट घेणार आहेत. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
क्रांतीची मशाल पेटवायची आहे
दरम्यान, आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजप राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने डचमळला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. अग्रलेखात संजय राऊत म्हणाले की, यात्रा विस्कळीत व्हावी म्हणून कोरोनाचे भय घातले. समस्त विरोधी पक्ष एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान अशा राज्यांनी मनावर घेतले तर इतर राज्यांतही जागरण होईल. प्रत्येकालाच नव्या स्वातंत्र्याची व क्रांतीची मशाल पेटवायची आहे.
2024 ला नक्कीच बदल होईल
विरोधकांच्या एकजुटीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून पावले टाकावी लागतील. तसे घडले तर 2024 ला नक्कीच बदल होईल. नाही तर शंभर आचारी रस्सा भिकारी असेच घडेल. लोकसभा निवडणुकीसाठी 400 दिवस उरलेत ,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. देशातील विरोधी पक्षांनासुद्धा तोच इशारा आहे.
विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय?
संजय राऊत म्हणाले, देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय, असा प्रश्न आता पडला आहे. अखिलेश, केजरीवाल, विजयन, नितीशकुमार यांना कुणाशी लढायचे आहे? काँग्रेसला दुबळे करून हे लोक भाजपशी कसे लढणार? गुजरातमध्ये ‘आप’ने विधानसभा निवडणुका लढल्या. त्यामुळे सगळय़ात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर तो फक्त भाजपचा. विरोधकांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही त्याचे हे फळ. विषय फक्त निवडणुकांचा नाही, तर देशात फोफावलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे. संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे दहा दिशांना कशी राहू शकतात? त्यांचे पाय दोन. त्यामुळे रस्ता एकच, पण दहा डोकी व दहा तोंडांनी बोलणे, विचार करणे सुरू आहे.
दिल्लीचा डोलारा सहज कोसळेल
संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय राजकारण करू पाहणारे सर्वच पक्ष प्रांतीय आहेत व त्यांना काँग्रेसला दूर ठेवायचे आहे. काँग्रेसची भीती त्यांना का वाटावी? काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा आकडा ‘शंभर’ पार करणे गरजेचे आहे व आज ही क्षमता फक्त काँगेसमध्येच आहे. काँगेस शंभर पार झाली की दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल. याचे भान राष्ट्रीय राजकारणात उडी मारणाऱ्या प्रत्येकाने ठेवायला हवे.
देशात अराजक माजले आहे
संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस लोकांचे समर्थन मिळत आहे याचे भय भाजपास वाटायला हवे, भाजपच्या विरोधकांना का वाटावे? काँगेस पक्षाशी आमचे वैचारिक मतभेद असू शकतात, पण ज्या भाजपशी आमचे वैचारिक मतभेद नव्हते, त्या भाजपने देशात असे काय दिवे लावले? आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांत कधी नव्हे इतके अराजक माजले आहे. हिंदू विरुद्ध मुसलमान व भारत विरुद्ध पाकिस्तान हाच त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे. न्यायालय विरुद्ध सरकार अशा संघर्षाची ठिणगी पडली आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. याचा फायदा विरोधक एकजुटीने घेत नसतील तर कसे चालेल?
संबंधीत वृत्त
खासदार विनायक राऊत यांची टीका:ठाकरेंना हरवण्यासाठी माेदी मुंबईत, भाजप म्हणजे नेते पळवणारी टाेळी
अन्य पक्षांतील नेते पळवून सत्ताप्राप्ती हा भाजपचा मंत्र असून जे नाशकात झाले तसेच काेकणातही झाले. शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनाही पळवून नेले. विधानसभेत भाजपचे बहुमत असले तरी महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी त्यांना विधान परिषदेत बहुमत नाही. ते मिळवण्यासाठी पळवापळवी हाेत असून सुज्ञ पदवीधरांनी सर्व प्रकारची प्रलाेभने टाळून खाेके सरकारला धडा शिकवावा, असा सूर महाविकास आघाडीच्या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर