पुणे8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
श्रीमंत बाजार कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगल्या प्रकारे अल्पावधीत परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेसह चारजणांची ५० लाख २६ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाेन संशयित आराेपींवर काेंढवा पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एैश्वर्या अनिल ढमाळ (वय- २६, रा.लाेणीकाळभाेर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाेलीसांनी सदर फिर्यादीनुसार आराेपी श्रीकांत रामाचार हाेलेहुन्नर (रा.पिंपळे निलख,पुणे) व नितीन विलास काेष्ठी (४२,रा. पिसाेळी, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ फेब्रुवारी २०२२ ते ३० एप्रिल २०२२ यादरम्यान काेंढवा, येवलेवाडी तसेच लाेणावळा परिसरात घडला आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आराेपी श्रीकांत हाेलेहुन्नर व नितीन काेष्ठी यांनी आपसात संगनमत करुन तक्रारदार ऐश्वर्या ढमाळ, मंदाकिनी काळभाेर, वैभव काळभाेर व सुवर्ण काळभाेर यांना विश्वासात घेवून गुंतवणुकीचे अमिष दाखवले. श्रीमंत बाजार कंपनीत गुंतवणुक केल्यास अल्पावधीत चांगला परतावा मिळेल असे आमिष आराेपीने दाखविल्याने, गुंतवणुकादरांनी त्यांच्याकडे विश्वासाने ५० लाख २६ हजार रुपये गुंतवणुक करण्यास दिले.
ठरलेल्या आर्थिक व्यवहारानुसार १०० दिवसानंतर ८० लाख ४२ हजार रुपये परतावा आराेपींनी देणे अपेक्षित हाेते. परंतु काेणत्याही प्रकारे परतावा न देता फसवणुक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांनी आरोपींकडे पैशाची वेळोवेळी मागणी करून ही त्यांना गुंतवणुकीचे पैसे तसेच परताव्याचे पैसे देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक एस. डिगाेळे करीत आहेत.
संशयित आरोपींनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणखी लोकांची फसवणूक केली असल्याची शक्यता असून फसवणुकीचा आकडा आगामी काळात पोलीस तपासात आणखी वाढू शकतो अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.