मुंबई9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले आहे. त्या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
राजस्थानात गेले त्यांचे बालपण
मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण राजस्थानात गेले. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये गणित शिकल्या. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी विवाह केला.
‘टप्पा’ अन् ‘तराना’ गायकीवर विशेष प्रभुत्व
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन मुंबई, तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवामध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली. मालिनी राजूरकर यांनी टप्पा आणि तराना या गायकीवर विशेष प्रभुत्व होते. ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’ ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते लोकप्रिय ठरली.
अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव
मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी आणि कुमार गंधर्व यांचा प्रभाव होता. त्यांनी 1980 साली अमेरिकेत आणि 1984 साली इंग्लंडमध्ये संगीत दौरे केले होता. 1970 पासून त्या हैदराबाद येथे राहात होत्या. मालिनी राजूरकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. त्यांना 2001 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2008 मध्ये त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बागेश्री, यमन आणि मारवा इत्यादी रागांचे त्यांनी गायन केले.