नाशिक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पारंपारिक वेशभूषेतील मावळे अन् पारंपारिक वाद्यांच्या गजरात रामशेज किल्ल्याचा रणसंग्राम अजरामर करणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची 342 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मोठ्या उत्साहात सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. गडपूजन, मुख्य स्तंभावरील ध्वजपूजन आणि शंभूराजांच्या प्रतिमेवर 12 नद्यांच्या जलाभिषेकाद्वारे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट, वैनतेय गिरीभ्रमण, गडवाट परिवार आणि मराठी मुलूख या संस्थांच्यावतीने सोमवारी (दि. 16) रोजी छत्रपती शंभूराजे यांचा 342 वा राज्याभिषेक सोहळा रामशेज किल्ल्यावर साजरा करण्यात आला. छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टतर्फे गेल्या आठ वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.
रामशेज किल्ल्यावर यंदाच्या सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.30 वाजता राम मंदिरातून छत्रपती शंभूराजांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. राज्यभरातून आलेल्या मावळ्यांनी पारंपारिक वाद्याचा गजरात रामशेजचा रणसंग्राम अजरामर करणाऱ्या शंभूराजांचा जयजयकार केला. भवानी मातेच्या मंदिरात गडपूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य स्तंभावर ध्वजपूजन व शंभूराजाच्या प्रतिमेवर 12 नद्यांचे पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती आळे, इतिहासाचे अभ्यासक गिरीश टकले, आशेवाडीचे सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच संदीप बोडके, वनविभागाचे अधिकारी अशोक काळे, राज्याभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष अमरदादा जाधवराव, डाॅ. दामोधर मकदुम, रवी पवार, आबासाहेब कापसे, ईश्वर सहाणे, प्रशांत परदेशी, मनोज बाग, अनिल दुधाणे, गाैरव गाजरे, अजिंक्य महाले, राहुल सोनवणे आदींच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक सोहळा पार पडला.
दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांचा सन्मान
राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मारुती मंदिरात आयोजित कार्यक्रमात दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या नाशिकच्या देहरगड टीम, कळसुबाई मित्र मंडळ, वृक्षवल्ली फाउंडेशन, शिवकार्य गडकोट, दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान, स्वराज्य संवर्धन संंस्था अशा एकूम 9 संस्थांचा गाैरव करण्यात आला.
उलगडला जाज्वल्य इतिहास
इतिहासाचे अभ्यासक गिरीश टकले यांनी यावेळी छत्रपती संभाजी महाराज आणि रामशेजचा लढ्याचा जाज्वल्य इतिहास उलगडला. इतिहासात रामशेजचा लढा हा मोगल मराठे संघर्षात अत्यंत महत्वपूर्ण आणि कलाटणी देणारा लढा म्हणून ओळखला जातो. अवघ्या 600 मावळ्यांनी 30 हजार मोगलांना युद्धात जेरीस आणले. आठ महिने हा लढा सुरु होता. शेवटी हार मानून ते गेले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात मुगलशाहीचे दक्षिण भारताविषयीचे डावपेच, रामशेजच्या रणसंग्रामात वापरण्यात आलेले हत्यारे, सैन्यदल, रोजच्या युद्धाचे वर्णन, मराठे शाही व मोगलांकडील शस्त्रसज्जता या इतिहासाची माहिती टकले यांनी यावेळी दिली.