हिंगोली9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली शहरालगत कोट्यावधी रुपये खर्च उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल चार महिन्यात दुसऱ्यांदा मंगळवारी ता. 22 वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गैरफाय कायम आहे.
हिंगोली येथे खटकाळी रेल्वे उड्डाणपूल सुमारे 70 ते 80 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे दिवसभरातून पाच ते सहा वेळेस रेल्वे गेट बंद करावे लागत होते. त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार चांगलेच वाढले होते. या रेल्वे उड्डाणपुलामुळे रेल्वे गेटवर वारंवार होणारा वाहतुकीचा खोळंबा दूर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मागील चार महिन्यापूर्वी या रेल्वे उड्डाणपुलाची ऑनलाईन उद्घाटन झाले. मात्र उद्घाटनानंतर एका महिन्यातच तपासणीच्या नावाखाली रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र या ठिकाणी काय तपासणी केली हे मात्र गुपितच ठेवण्यात आली. प्रवाशांच्या तक्रारीनंतर तीन दिवसानंतर रेल्वे उडान पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
दरम्यान या रेल्वे पुलावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाच्या भिंतीलाच तडे गेल्यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मागील तीन दिवस हिंगोली मध्ये पाऊस झाल्यानंतर उड्डाणपुलावर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातूनच प्रवाशांना वाहतूक करावी लागत आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा तपासणीसाठी रेल्वे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता रेल्वे विभागाकडून तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आली आहे. मात्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी वाशीम येथे बैठकीत असल्याचे सांगितले. त्यामुळे रेल्वे पुलाच्या कामाची तपासणी कोण करत आहे असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.