लखनऊ संघाविरुद्ध गुरुवारी २१० धावांचा बचाव करताना ब्रेबॉर्नवर पडलेले दवबिंदू पाहून सीएसकेचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग चांगलेच भडकले. त्यांनी या दवबिंदूंची तुलना नायगारा फॉलच्या धबधब्यातून वाहणाऱ्या पाण्याशी केली. १९ वे षटक फिरकीपटूऐवजी शिवम दुबे याला देण्याच्या निर्णयाचे मात्र त्यांनी समर्थन केले.
लखनौला १२ चेंडूंत ३४, तर अखेरच्या षटकात नऊ धावांची गरज होती. आयुष बदोनी आणि एविन लुईस यांनी तुफानी फटकेबाजी करीत सामना खेचून नेला. दुबेने सहा चेंडूंत चक्क २५ धावा मोजल्या. सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाले, ‘मैदानावर दव पडत होते. फिरकीपटू चेंडूवर ग्रिप मिळवू शकत नव्हते. लखनऊने याच संधीचा लाभ घेतला. मैदानावर जडेजाने फिरकीपटूऐवजी दुबेकडे चेंडू सोपविण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. मोठ्या प्रमाणावर दवबिंदू पडत असताना तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांनी अप्रतिम मारा केला. आम्ही या सामन्यात युवा खेळाडूंना संधी दिली. मात्र, आउटफिल्ड फारच ओलसर असल्यामुळे चेंडू वारंवार ओला होत होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर ब्रेबॉर्नवर गोलंदाजी करणे फारच कठीण झाले होते.’
सामन्याच्या अंतिम घटकांमध्ये लखनऊला विजयासाठी २ षटकांमध्ये ३४ धावांची आवश्यकता होती. सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने १९ व्या षटाकात शिवम दुबे याला गोलंदाजी दिली आणि त्याने या षटकात तब्बल २५ धावा खर्च केल्या. त्यानंतर लखनऊला विजयासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. एविन लुईस आणि आयुष बदोनी यांच्या तुफानी खेळीमुळे लखनऊने ३ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘जर तुम्ही आधिच्या परिस्थितीवर नजर टाकली, तर फिरकी गोलंदाजांचा पर्याय वापरला जाऊ शकत नव्हता. कारण जोपर्यंत दवाचा प्रश्न आहे, तर ते नायगरा वॉटरफॉल प्रमाणे होती.’
प्रशिक्षकांच्या मते दव पडल्यामुळे चेंडूवर व्यवस्थित पकडणे अवघड झाले होते. फ्लेमिंगने असेही सांगितेल की, ’सामन्यात आम्ही काही युवा खेळाडूंना आजमावले. मुकेश पहिल्यांदाच खेळत होता, तुषार देशपांडेने याआधी काही सामने खेळले आहेत. पण खरे तर हेच आहे की, गोलंदाजी करणे कठीण होते. चेंडू आणि मैदान खूप ओले होते.’