पुणे27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे ते अहमदनगर रस्त्यावर शिरूर येथील कोरेगाव भीमा येथील ढेरांगे वस्ती येथील दोन शाळकरी मुले भीमा नदीत पोहण्यासाठी गेल्यावर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तपास माेहीम राबविली. नदीत बुडालेल्या मुलांचे मृतदेह २४ तासाने अग्निशामक दलास सोमवारी मिळाले आहे.
गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६, दोघे रा. ढेरांगे वस्ती, कोरेगाव भीमा) आणि अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अनुराग आणि गौरव रविवारी शिरूर येथील भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या बंधाऱ्याचे ढापे उघडले असल्याने सध्या पाण्याचा जोरात प्रवाह सुरू होता.
यावेळी पाण्याचा दोघांना अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत पोहणाऱ्या मुलांनी अनुराग आणि गौरव बुडाल्याचे पाहून मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केला. मात्र, सदर दोघांना वाचिण्यात अपयश आले. या घटनेची माहिती मिळताच, शिक्रापूर पोलीस, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक जवानांनी बुडालेल्या दोन मुलांचा नदीपात्रात शोध घेण्यासाठी तपास सुरू केला परंतु अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.
सोमवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली. दुपारी सदर दोघांचे मृतदेह मिळून आले. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले, अशी माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली आहे. अनुराग आणि गौरव एकुलते एक मुले होते. दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आल्यानंतर कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आणि सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.