मुंबई35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल. प्रजासत्ताक दिन ‘चिरायू’ ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून राज्यातील शिंदे-भाजप, केंद्रातील मोदी सरकारवर करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, आज आपला भारत देश 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त गावखेड्यापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीत पथसंचलन होणार आणि पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार आहेत.
अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ
अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, एकीकडे हिंदुस्थानातील तरुण वर्ग बेरोजगारीने ग्रासलेला आहे. नोकऱ्यांसाठी वणवण भटकतो आहे, शेतीचा खर्च आणि शेतमालाचा भाव यांचा कुठेच मेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये मात्र दररोज साडेतीन हजार कोटी रुपयांची वाढ होत आहे. राज्यघटना स्वीकारली तो दिवस म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.
सगळीकडे ताटाखालची मांजरे
त्या घटनेप्रमाणेच हा देश चालेल, असा शब्द देऊन आपण राज्यघटना स्वीकारली, पण आज देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे काय? घटनेने न्यायपालिका, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक वगैरे संस्थांना दिलेली स्वायत्तता विद्यमान सरकारला मान्य नाही. सगळीकडे ताटाखालचीच मांजरे हवीत आणि सरकारी हुकमांना ‘होयबा’ म्हणणारे लोक हवेत, अशी हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचे प्रजासत्ताक सापडले आहे.
दडपशाहीला प्रजासत्ताक म्हणावे?
अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, घटनाविरोधी कारवाया करून विरोधी पक्षांची सरकारे उलथविली जातात, घटनाबाहय़ सरकारे आणली जातात. पक्षपाती निर्णय घेऊन एका राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जातात. या दडपशाहीलाच प्रजासत्ताक म्हणावे काय?” असं सामनाच्या अग्रलेखाद्वारे म्हटलं आहे.
अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होईल. शाळा, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जरूर ओसंडून वगैरे वाहताना दिसेल, पण ज्या कारणासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, त्या सामान्य प्रजेला, शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतमजुरांना, कामगार-कष्टकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना ही प्रजेची सत्ता आहे, असे खरोखरच वाटते आहे काय? असा सवाल सामनातून विचारला आहे.
हिंदुस्थान हे लोकशाही राष्ट्र
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाचा आनंद गाव, खेडी, तांडे, वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर दिसतो आहे का? हिंदुस्थान हे लोकशाही राष्ट्र आहे आणि इथे प्रजेची सत्ता आहे, असा शब्द देशातील जनतेला देउन आजच्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपण राज्यघटना स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत आपण 73 प्रजासत्ताक दिन साजरे केले.
जगण्या-मरण्याचे असंख्य प्रश्न
दरवर्षी महामहिम राष्ट्रपती महोदय दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवून देशाला उद्देशून भाषण करतात. ‘रिपब्लिक डे’ परेड होते, विविध राज्यांचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे चित्ररथ दौडतात, लष्करी जवानांचे चित्तथरारक स्टंट पाहायला मिळतात. हे सगळे सोहळे आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. सालाबादप्रमाणे आजच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनीदेखील राष्ट्रपतींचे लाल किल्ल्यावरील भाषण आणि इतर सरकारी सोपस्कार पार पडतील, पण ज्या जनतेचे हे प्रजासत्ताक आहे, त्या सर्वसामान्य जनतेचे जगण्या-मरण्याचे जे असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे त्यातून मिळणार आहेत का?” असं विचारण्यात आले आहे.