प्रतिनिधी | माढा2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महातपूर (ता. माढा) आणि कपिलापुरी (ता. परंडा) येथील प्रेमीयुगुलाच्या विवाहाला कलाटणी मिळाली आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपण ओंकारला ओळखत नसल्याचे सांगितले. ‘कोण ओंकार? मला माहिती नाही. मला लग्न झालेले आठवत नाही. मला काही तरी खायला-प्यायला दिल्याने काही आठवत नाही,’ असा जबाब मुलीने दिला आहे.
महातपूरच्या ओंकार झळके व कपिलापुरीच्या मनाली देवळकर या प्रेमीयुगुलाने कुटुंबीयांचा विरोध होईल म्हणून ३ मे रोजी पळून जाऊन नाशिक येथे लग्न केले होते. त्यानंतर मुलीने परांडा पोलिसांत स्वत: हजर होत मी सज्ञान असून ओंकारशी स्वखुशीने लग्न केल्याचे जबाब दिला होता. त्यानंतर मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांसह नातेवाइकांनी ११ मे रोजी मध्यरात्री मुलाच्या घरात घुसून लोखंडी राॅडने मारहाण करून मुलीला नेल्याची फिर्याद प्रियकर मुलाने माढा पोलिसांत दिली. त्यानुसार मुलीच्या वडिलांसह १३ नातेवाइकांवर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, मारहाण करून मुलीला नेणाऱ्यांना शोधण्यासाठी माढ्याचे पोलिस निरीक्षक बी.एन.खणदाळे यांनी पथक तैनात केले होते. आरोपींना अटक करण्यात आली. मात्र मुलीने वेगळाच जबाब दिल्याने या प्रेमविवाहाला कलाटणी मिळाली आहे. पोलिस हवालदार विशाल पोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुलीचा जबाब असा…
‘कोण ओंकार? मी ओळखत नाही. मला त्याने जबरदस्तीने दुचाकीवर नेले. काही तरी खाऊ घातलं. ३ मे व ४ मे रोजी काय झाले, हे मला काहीच आठवत नाही. मी महातपूरमध्ये असल्याचे समजल्यानंतर लगेच वडिलांना फोन करून बोलावून घेतले. वडील व चुलत्यांबरोबर गाडीत बसून गेले. घरातून जाताना मला अडवल्याने माझ्या वडील व झळके कुटुंबात धक्काबुक्की झाली. मी माझ्या वडिलांसोबत आनंदी आहे.’
स्वखुशीने वडिलांबरोबर गेल्याचे मुलीने सांगितले
मुलीच्या वडिलांनी मुलाला मारहाण करून मुलीला नेल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र मुलीने वेगळा जबाब नोंदवला आहे. मुलीने वडिलांना बोलावून स्वखुशीने त्यांच्यासोबत गेल्याचे सांगितले आहे.- बी. एन. खणदाळे, पोलिस निरीक्षक माढा पोलिस स्टेशन