आयपीएलचे पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची २०२२च्या हंगामात अतिशय खराब कामगिरी झाली. संघाने सलग ७ सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न देखील जवळ जवळ संपुष्टात आले आहे. कर्णधार रोहित शर्मासह संघाची कामगिरी खराब झाली आहे. फलंदाजांच्या सोबत गोलंदाजांना धावा रोखण्यात आणि विकेट मिळवण्यात अपयश येत आहे. यावर्षी मेगा लिलावानंतर मुंबईतील अनेक मुख्य खेळाडू दुसऱ्या संघात गेले. काल गुरुवारी चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईचा अखेरच्या चेंडूवर पराभव झाला.
मुंबई इंडियन्स संघाच्या या खराब कामगिरीवर संघाचा मेंटर सचिन तेंडुलकरने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नईविरुद्धच्या लढतीआधी सचिन म्हणाला, मुंबईचा संघ युवा आहे आणि चुकांपासून शिकत आहे. संघ सध्या कठीण काळातून जात आहे. यासाठी आपल्याला त्यांच्या सोबत राहिले पाहिजे. एक संघ म्हणून पुढे गेले पाहिजे. हा युवा खेळाडूंचा संघ आहे आणि ते चुका करतील आणि त्यातून शिकतील देखील. सचिनच्या मते गेल्या काही वर्षातील मुंबईने जी कामगिरी केली आहे त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून फार अपेक्षा असतात.
टी-२० हा फॉर्मेट असा आहे की सर्व संघ अशा काळातून जातात. आपल्याला सर्वात आधी हे समजून घेतले पाहिजे की या फॉर्मेटमध्ये असा कोणताही संघ नाही ज्यांनी असा अनुभव घेतला नाही. सामन्यातील महत्त्वाचे क्षण तुमच्या बाजूने असत नाहीत. कधी कधी तुम्ही २ किंवा ३ धावांनी किंवा अखेरच्या चेंडूवर पराभूत होता. अगदी प्रामाणीकपणे बोलायचे झाले तर संधी आमच्या बाजूने आल्या नाहीत. मी आणखी एक गोष्ट सांगतो, अशा कामगिरीनंतर खेळाडू सराव करताना प्रचंड मेहनत घेतात. ते कुठेच कमी पडत नाहीत.
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. पण त्याआधी सलग दोन विजेतेपद त्यांनी मिळवली होती. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद मिळवली आहेत.