मुंबई33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबई ते नागपूर या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (नागपूर शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता शिर्डी ते नाशिक या दुसऱ्या टप्प्यापर्यंत मार्ग 26 मे रोजी खुला होणार आहे. त्यामुळे आता नागपूरहून नाशिकपर्यंत मार्गक्रमण करता येणार असून हे अंतर वाहनांना सहा तासांत कापता येणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरूच असून आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या 26 मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे.
चाळीस मिनिटांचा टप्पा
शिर्डी ते नाशिक भरवीर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला असून हे अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे.
200 किमी टप्प्याचे काम प्रगतीपथावर
मुंबई ते भरवीर या उर्वरित 200 किलोमीटरच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.
पूर्ण समृद्धीमार्ग कधी खुला होणार?
शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल. सध्या शिर्डीपर्यंत जुन्या महामार्गानंच जावं लागतं, ज्यासाठी अडीच ते चार तास लागतात.