छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
येत्या १७ सप्टेंबर राेजी शहरात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यासाठी मंत्री, सचिवांसह जवळपास ५०० कर्मचारी येणार आहेत. त्यांच्यासाठी हाॅटेल, विश्रामगृहाच्या ५०० खाेल्या, २०० वाहनांची व्यवस्था करावी लागणार अाहे. सुभेदारी विश्रामगृहात मंंत्र्यांना निवेदन देण्यासाठी लोक येणार आहेत. त्यांच्यासाठी वॉटरप्रूफ शामियाना उभारण्यात येणार आहे. शासकीय निवासस्थानामध्ये राहणाऱ्या अधिकारी, इतर लोकांसाठी पिण्याचे पाणी, वीज, शौचालय तसेच इतर सुविधा चोख ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त मधुकरराजे अार्दड यांनी दिल्या आहेत. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात आली. मंत्रिमडळासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था १४ विविध शासकीय निवासस्थानांमध्ये करण्यात येणार आहे. मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था सुभेदारी, रामा हॉटेल, तर सचिवांची व्यवस्था ताज, ओएसडी आणि उपसचिव लेमन ट्री हॉटेल, सर्व सहसचिव अमरप्रीत हॉटेल, मंत्र्यांचे स्वीय सहायक फर्न रेसिडेन्सी, वाहनचालक आणि अंगरक्षक महसूल प्रबोधनी, अाैरंगाबाद जिमखाना, सुभेदारी, शासकीय वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मंत्री, सचिवांसाठी जवळपास २०० गाड्या लागणार आहेत. त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१७ समित्या नेमल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी १७ वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समन्वय कक्ष, अर्थ समिती कक्ष, राजशिष्टाचार, वाहतूक व्यवस्था, भोजन, प्रसिद्धी, निवास व्यवस्था, नियंत्रण कक्ष, सुरक्षा पासेस, स्वागत कक्ष अशा समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीत पाच ते दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वीज, शौचालये, पाणीपुरवठ्याची खात्री करा
विश्रामगृह व बैठकीच्या ठिकाणी स्वच्छतागृह सुस्थितीत असल्याची खात्री करा. पाणीपुरवठा व्यवस्थित राहावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या. प्रमुख अतिथीच्या निवासस्थानी टीव्ही, वर्तमानपत्रे असतील. याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असेल.
सुभेदारीमध्ये स्वीकारणार नागरिकांची निवेदने
सुभेदारी विश्रामगृहात अनेक संघटना, राजकीय पक्षांचे लोक निवेदन देण्यासाठी येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी शामियाना उभारण्यात येणार आहे. येथे बॅरिकेडिंग करण्यात यावी. निवेदन स्वीकारण्यासाठी पथकाची नियुक्ती करावी. बैठकीच्या ठिकाणी मनपाने मंत्र्याचे स्वीय सहायक, सुरक्षा रक्षक, संपर्क अधिकारी, प्रादेशिक अधिकारी यांंच्या बसण्याची व्यवस्था करावी. त्याबाबतचे सूचना फलक लावण्याचा सूचना देण्यात आल्या.
विमानतळ, रेल्वेस्टेशनवर स्वागत कक्ष उभारणार
विमानतळ व रेल्वेस्टेशनवर स्वागत कक्ष उभारण्यात येईल. तेथे शामियाना लावून खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार अाहे.