अमरावती4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सातेगाव वळण मार्गावर पलटी झालेली कार.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी ते सातेगाव या मार्गावर भरधाव कार अनियंत्रित होवून पलटी झाली. या अपघातात पाच जणांसह तीन वर्षांचा चिमुकला जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास घडली. जखमींमध्ये गोंदिया येथील दोन कुटुंबियांचा समावेश आहे. संजय चौरागडे (४५), वामन बिजेवार (५०), पुष्पकला बिजेवार (४०), अजय बिजेवार (४५), तृप्ती संजय चौरागडे (३५) व तीन वर्षीय संजय चौरागडे या चिमुकल्याचा समावेश आहे. हे सर्व गोंदिया येथील रहिवाशी आहेत.
घटनेच्या वेळी गोंदिया येथील बिजेवार व चौरागडे परिवार तालुक्यातील सातेगाव येथे चार चाकी वाहनाने (एमएच ३१/ पीके ००८६) विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान मुऱ्हा देवी ते सातेगाव वळण मार्गावर वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाले. सुदैवाने या अपघतात कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी त्यातील दोन्ही कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झालेत. त्यांना अंजनगाव सुर्जी येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वळण मार्गावर नाही दिशादर्शक फलक
घटनास्थळी दिशादर्शक फलक नसल्याने पुढे वळण असल्याचे चालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. याच वळणावर पंधरा दिवसांपुर्वी बुलढाणा येथील प्रवाशांची सफारी कार पलटी झाली होती, तसेच या पूर्वीसुद्धा या ठिकाणी लहान मोठे अपघात झाले असल्याची चर्चा घटनेच्या अपुषंगाने नागरिकांमध्ये होती.
दिशादर्शक फलकाची मागणी अपूर्णच
”हा मार्ग पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून झाला असून या मार्गावर कुठेही दिशादर्शक नाहीत. अपघात झालेल्या वळणावर आतापर्यंत पाच ते सात वेळा अपघात झाले असून त्यामध्ये एक व्यक्तीला प्राणाला मुकावे लागले आहे. मी बरेच वेळा पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना या मार्गावर दिशादर्शक देण्याची मागणी केली असून ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही.”– रवी बोंद्रे, सरपंच, वरुड खुर्द