भारत आण न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामन्याचा टॉस यावेळी दुपारी १.०० वाजता होणार आहे. टॉस झाल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार आपले संघ जाहीर करतील. दोन्ही कर्णधारांनी आपले संघ जाहीर केल्यावर अर्ध्या तासाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर हा सराव सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता रंगणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.
हा सराव सामना भारतासाठी महत्वाचा असेल. कारण विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी भारताला या सराव सामन्यात प्रयोग करण्याची चांगली संधी असेल. आतापर्यंत भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठे प्रयोग केले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली खेळला नव्हता. पण पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या भन्नाट फलंदाजीमुळे भारताने विजय साकारला होता. दुसऱ्या सराव सामन्यात लोकेश राहुलकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले होते, पण हा सामना भारताला गमवावा लागला होता.
तिसऱ्या सराव सामन्यात भारताने संघातील अनुभवी खेळाडूंना संधी दिली असली तरी यामध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले होते. या सामन्यात रोहित शर्माने संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला फक्त एकच षटक दिले होते. या एकाच षटकात शमीने तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघात कोणाला संधी मिळते, कोणते प्रयोग यावेळी केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.