मुंबई17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्यातील तापमानात सासत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कुठे ढगाळ वातावरण तर कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे. आता पुन्हा हवामान विभागाने राज्यातल्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामाना विभागाने दिलेल्या माहितीनूसार, आजपासून म्हणजे 12 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता असल्याने हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.
कोणत्या भागात पावसाचा अंदाज
गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या भागात उन्हाचा चटका
दरम्यान, काल (11 मार्च) कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर उर्वरित ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या नजीक पोहोचले आहे. सांताक्रूझ (मुंबई) येथे सर्वाधिक 37.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, तर पुण्यात 14.7 एवढ्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सांताक्रूझ (37.5), रत्नागिरी (37.4), पणजी (36.0), सोलापूर (36.2), उस्मानाबाद (35.3), परभणी आणि यवतमाळमध्ये (35.0), नांदेड (35.02), अकोला, अमरावती, वाशीममध्ये (36.02), ब्रह्मपुरी (36.9), वर्धा (35.4) या ठिकाणी कमाल तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे.