प्रतिनिधी | अमरावती37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बदली प्रक्रियेत तीन दिवसांत २४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १७९ कर्मचाऱ्यांची मेळघाटात तर ४७ कर्मचारी बदलीने सपाटीवर परतले आहेत. शुक्रवारी शिक्षण व आरोग्य विभागातील ५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेत बुधवारी १० मेपासून बदलीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी सात विभागातील ११४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन विभागातील ८० तर शुक्रवारी शिक्षण व आरोग्य या दोन विभागातील ५५ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पद स्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजेपासून बदली प्रक्रियेला सुरूवात झाली. सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासह अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, एडीएचओ पाटील आदींचीं उपस्थिती होती. सुरूवातीला शिक्षण विभागाच्या बदल्यांना सुरूवात कली आहे.
या विभागात केंद्र प्रमुख १, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक १ यांची बदली करण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक महिला ६, आरोग्यसेवक महिला ३९, औषध निर्माता अधिकारी ४ व आरोग्य पर्यवेक्षक ४ अशा ५५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये २९ कर्मचाऱ्यांची मेळघाटात तर ११ कर्मचाऱ्यांची सपाटीवर बदली करण्यात आली. या तीन दिवसांत २४९ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली. या बदली प्रक्रियेकरीता पंकज गुल्हाणे, राजेश रोंघे, प्रमेश्वर राठोड, किशोर गुल्हाणे, समीर लेंडे, श्रीकांत मेश्राम, जयंत गंधे, नितिन माहोरे आदी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.