औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
२८ आणि २९ जानेवारी २०२३ ला नाशिक मध्ये ९ वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बरोबर २२ वर्षांपूर्वी नाशिक शहरात सहाव्या अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पार पडले हाेते. मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर आणि लेखक व विचारवंत विलास सोनवणे हे दोघेही जग सोडून गेलेत. परंतु प्रागतिक चळवळीचा वारसा ते सोपवून गेल्यामुळेच या संमेलनाचे आयोजन करणे शक्य झाले आहे. दलित, आदिवासी व ग्रामीण साहित्य संमेलनातील जाणीवा घेऊनच मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचा जन्म झाला. हे संमेलन मुस्लिम समाजाची संवेदना मांडणारी चळवळ आहे, ही भूमिका प्रा. बेन्नूर आणि विलास सोनावणे आग्रहाने मांडत. प्रा. बेन्नूर त्यांच्या ‘भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता’ या पुस्तकात नोंदवतात की, सुफीचे मुख्य १४ संप्रदाय आहेत. त्यापैकी नक्शबंदी, कादारीया, चीस्तीया, सुऱ्हावर्दीया, जुनैदिया हे प्रमुख संप्रदाय आहेत.
जातिव्यवस्थेच्या जाचक कायद्यांना झुगारण्याची प्रेरणा सुफी संतांनी दिली. पण तेव्हाही ज्या जाती उत्पादन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडत होत्या आणि त्या येवढा मोठा निर्णय घेण्यासाठी सक्षम होत्या त्यांनी तेंव्हा इस्लाम स्वीकारला. परंतु भारतीय समाजव्यवस्थेचा भाग म्हणून त्या कित्येक वर्षे तशाच राहिल्या आणि आहेत. मुस्लिम समाजात याला बिरादरी म्हटले जाते. हेच वास्तव मंडल आयोग अंमलबजावणीसाठीच्या चळवळीतून समोर आले. त्यामुळेच मुस्लिम हे याच समाजव्यवस्थेचा एक भाग आहे, हे सिद्ध करता आले. आजच्या परिस्थितीत मराठी मुस्लिम म्हणून जगतांना जे भोगावे लागते त्या वेदनेचे नाते दलित, आदिवासी व ग्रामीण साहित्यातून आलेल्या वेदनेशी घट्ट असल्याने अशी साहित्य संमेलने होणे महत्त्वाचे आहे. – विक्रम गायकवाड , येवला