छत्रपती संभाजीनगर33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लग्नात शंभरावर नातेवाईक, मंडप थाटला, पाहुण्यांची जेवणाची तयारी सुरू… पण लग्नस्थळी नवरदेवाचे वऱ्हाड पोहोचण्याच्या आधीच पोलिसांचे पथक येऊन धडकले. कारण होते बालविवाहाचे. पाच महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले. घरी अठराविश्वे दारिद्र्य असल्याने आईने मुलीचे लग्न ठरवले होते. पोलिसांनी कायदेशीर बाजू समजावून सांगितल्यानंतर लग्न रद्द झाले.
१८ मार्च रोजी कांचनवाडी भागात हा प्रकार घडला. सोळा वर्षांची रचना (नाव काल्पनिक आहे) सध्या दहावीचे शिक्षण घेते. घरात आई, चौदा वर्षांची बहीण आणि अकरा वर्षांची बहीण असते. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांना कर्करोगाने निधन झालेे. नंतर घरभाडे भरायचे संकट उभे राहिलेल्या जान्हवीच्या आईला काही नातेवाइकांनी ओळखीतल्या २१ वर्षांच्या मुलाचे स्थळ सुचवले. रचनाच्या पुढील शिक्षणाचा खर्च अशक्य होता. इतर दोन मुलांच्या संगोपनाचा प्रश्न असल्याने तिच्या आईने मुलगा चांगला असल्याची खात्री करून लग्न ठरवले. १८ मार्च रोजी बालविवाह होत असल्याचा कॉल पोलिसांना गेला. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी सहकारी अम्रपाली बोरडे, सुभाष मानकर, उमेश श्रीवास्तव यांच्यासह धाव घेतली.
पथकाने समजूत काढली, नंतर कुटुंबाला दिली नोटीस फसाटे यांनी मुलीची आई, नवऱ्याकडच्यांना ‘बालविवाहात मुलगी जरी तयार असली तरी लग्नानंतर बालविवाह प्रकरणात बलात्कार, पोक्सोसारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल होतात,’ या बाबी समजून सांगितल्या. त्यानंतर त्यांनी लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. फसाटे यांनी त्यानंतर रीतसर कुटुंबाला तशी नोटीस दिली.