मुंबई35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अखेर 17 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचं उपोषण सोडले. त्यामुळे मराठा आंदोलन तूर्तास थांबले आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याने विविध राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत केले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुक पोस्टद्वारे जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य सरकारवर सणसणीत टीका केली आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावी, यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज 17 व्या दिवशी मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फळांचा रस देऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. गेली आठवडाभर शिष्टाई करत असलेल्या राज्य शासनाला उपोषणाची कोंडी फोडण्यात आज यश मिळाले. ज्यानंतर राज ठाकरे यांनी विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.
राज ठाकरेंची पोस्ट काय?
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले 17 दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतले, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरे झाले. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासने दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.
आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितले पाहिजे.
गेले17,18 दिवस महाराष्ट्रात जे घडले, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचे भान येऊन, पोटातले ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.
एकनाथ शिंदेचे न्याय देतील- जरांगे पाटील
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्युस पित उपोषण मागे घेतले. त्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधला. त्यातच त्यांनी सर्व भूमिका स्पष्ट केली. आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? याबाबत जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की मराठा समाजाला न्याय देतील ते फक्त एकनाथ शिंदेच आहेत. तीच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे.
समाजाला विचारून एका महिन्यांचा वेळ
सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला होता. याआधी मी संपूर्ण समाजाला विश्वासात घेतले. बैठका घेतल्या. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का? तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचे का? हे प्रश्न मी सगळ्यांना विचारले त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.