पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच महाराष्ट्र राज्यामध्ये 15 हजार महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र समाज कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन पोर्टल शुभारंभ, पुणे जिल्ह्यातील विविध योजनांचा लाभार्थ्यांच्या यशोगाथा पुस्तिका प्रकाशन, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते येथील सामाजिक न्याय भवन येथे संपन्न झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांविषयी येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न याचे निराकरण महाविद्यालयस्तरावरच व्हावे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व त्यातून समाजामध्ये जनजागृती करणे यासाठी देशात प्रथमच राज्यात महाविद्यालयस्तरावर समान संधी केंद्र सुरू करण्यात आल्याचे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगून विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडविण्याबरोबर, विचारधारा जोपासण्याचे काम करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील महाविदयालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समाज संधी केंद्रातील प्राध्यापक, सभासद, संबंधित महाविदयालयाचे प्राचार्य व विदयार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांचेसाठी लवकरच राज्यस्तरावर महासंमेलन आयेाजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी देखील देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण २७ टक्के असल्याचे नमूद करून त्यात मागासवर्गीय समाजाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगितले, सदर परिस्थिती बदलण्यासाठी व त्यातून लोककल्याण साधण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक बदल करणे आवश्यक आहे व त्या बदलांसाठी समान संधी केंद्र ही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत असेही त्यांनी सांगून समाज कल्याण विभागाच्या योजनांबरोबरच समाजासाठी व विदयांर्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या सर्वच विभागाच्या योजनांची माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी विदयापीठामार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.