अंबरनाथकाही सेकंदांपूर्वी
- कॉपी लिंक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा परिणाम दिसतोय, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
राहुल गांधींचा प्रभाव
आज अंबरनाथ येथे पक्ष संघटनेचे आढावा राज ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, माध्यमांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी कर्नाटकात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसत आहे.
जनतेला कुणी गृहीत धरू नये
राज ठाकरे म्हणाले, मी यापूर्वी म्हणालो होतो की कोणत्याही निवडणुकीत विरोधी पक्ष जिंकत असतो. सत्ताधारी पक्ष हरत असतो. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या स्वभाव, वागणुकीचा पराभव झाला आहे. आपल कोणी वेडेवाकडे करू शकत नाही, अशी भाजपची समजूत होती. मात्र, जनतेला कुणी गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा.
निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम?
कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल का? या प्रश्नांवर राज ठाकरे म्हणाले की, कर्नाटक ही त्या राज्याची निवडणूक होती. महाराष्ट्रात किंवा लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे परिणाम होतील की नाही, हे आताच सांगू शकत नाही.
सुधीर मुनगंटीवार यांना टोला
दरम्यान, पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, पहाटेचा शपथविधी ही भाजपची चूक होती. आता चूक झाली तर झाली. कोणाला धडा शिकवायला जाऊ नका, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांना सुनावले. तसेच, भाजपने हे केले त्यानंतरच महाराष्ट्राचे राजकारण घसरले, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
संबंधित वृत्त
‘पहाटेचा शपथविधी’ राजकीय ऑपरेशन:उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी गमिनी कावा, सुधीर मुनगुंटीवारांच्या वक्तव्याने खळबळ
पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. वाचा सविस्तर