प्रतिनिधी | सोलापूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
संजय गांधी निराधार आणि श्रावण योजनेच्या लाभार्तींना एकवीस हजार रुपये उत्पन्नाचा दाखला आणि हयात दाखला दरवर्षी सादर करण्याची सक्ती शिंदे-फडणवीस सरकारने जीआर काढून केली आहे. या शासन निर्णयाची आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी दुपारी होळी करून बोंबाबोंब आंदाेलन केले. धनदांडग्यांसाठी काम करणाऱ्या खोके सरकारने निराधारांना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही त्यांनी केली.
७० फूट भाजी मार्केट चौक येथे दुपारी काँग्रेसने सरकारच्या निर्णयाविराेधात आंदाेलन केले. जीआरची होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या नावाने बोंबाबांेब आंदाेलन करण्यात आले. आमदार शिंदे म्हणाल्या, २०१९ साली तत्कालीन भाजप सरकारने संजय गांधी निराधार आणि श्रावण योजनेच्या लाभार्थींनी हयात दाखला आणि एकवीस हजारांचे उत्पन्न दाखले दरवर्षी सादर करावे असा निर्णय घेतला आणि जे सादर करत नाहीत त्यांचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले. नंतर महाविकास आघाडी सरकारने दाखल्याची सक्ती न करता पूर्वीप्रमाणे अनुदान वाटप सुरू ठेवले, पण आता दाखले सादर करण्याची सक्ती केली जात आहे. भाजप सरकारला लाभार्थी कमी करायचे आहेत. काँग्रेसच्या योजनेमुळे निराधार गोरगरिबांना एक हजार पेन्शन मिळायची. ही योजना भाजपला बंद पाडायची आहे. पन्नास खोक्याचे सरकार आहे. धनदांडग्यांसाठी काम करणारे सरकार आहे. हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, आरिफ शेख, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, रमेश राठी, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला उपस्थित होते.