कोल्हापूर21 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पतीसोबत भाजीपाला विक्रीसाठी आठवडी बाजाराला गेलेल्या एका महिलेची भर बाजारातून अपहरण झाल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरच्या गडहिंग्लज शहरात घडली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, गडहिंग्लज नगरपरिषदेपुढे असणआऱ्या रस्त्यावर रविवारी पहाटे 6.45 च्या सुमारास ही घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. अपहृत 30 वर्षीय महिला गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ येथील रहिवासी होती. या प्रकरणी त्यांचे पती लक्ष्मण शंकर नवलगुंदे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी 2 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय घडली घटना?
यासंबंधीच्या वृत्तानुसार, लक्ष्मण व त्यांची पत्नी लता हे दोघे मिळून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. ते रविवारी गडहिंग्लजमध्ये आठवडी बाजारासाठी पहाटेच भाजीपाला घेऊन आले होते. त्यांच्यासोबत अन्य एक नातलग महिलाही भाजीपाला घेऊन आली होती. दोघे पती-पत्नींनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपले दुकान थाटले.
कारमध्ये कोंबून पळून गेले
पती लक्ष्मण नगरपरिषदेच्या आवारात भाजीपाला विकत होते. तर पत्नी होळकर चौकात भाजीपाला विक्री करत होती. यावेळी त्यांच्यासोबत आलेली नातलग महिला लघुशंकेसाठी बाहेर गेल्यानंतर तोंड बांधून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी लता यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबून घेऊन गेले.
यावेळी लता यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या महिलेनेही आरडाओरडा केला. तसेच धावत जावून लक्ष्मण यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी आपल्या वाहनाने अपहृतांच्या वाहनाचा पाठलाग केला. पण त्यांना ते सापडले नाही. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन मदतीची याचना केली.
महिलेचे गतवर्षीही झाले होते अपहरण
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हीच महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पतीने दाखल केली होती. पण त्यानंतर 4 दिवसांनी ही महिला स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाली. चंदनकूडमधील एकजण तिला त्रास देत होता. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. रविवारी अपहरणाची तक्रार दाखल करताना पीडित पतीने ही माहिती दिली.