नाशिक42 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील जवान अजित शेळके यांना राजस्थानमध्ये वीरमरण आले आहे. अवघ्या 29 व्या वर्षी त्यांना आलेल्या वीरमरणामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावातही शोकमग्न वातावरण आहे. अजित यांचे पार्थिव सोमवारपर्यंत त्यांच्या गावी येण्याची शक्यता आहे.
अजित गोरख शेळके हे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक या गावाचे सपुत्र आहेत. सध्या ते राजस्थानमधील गंगानगर येथे कर्तव्यावर होते. याचठिकाणी त्यांना वीरमरण आले. देशाचे संरक्षण करत असलेल्या जवानाचे निधन झाल्याने येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
युनिटमध्ये अपघात
अजित शेळके हे राजस्थानमधील ड्यूटी संपवून घरी परतत असताना युनिटमध्ये अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
संपूर्ण गावाला चटका
अजित शेळके यांनी बालपणीपासूनच सैन्यात भरती होण्यचे स्वप्न पाहिले होते. त्यांना देशसेवेची मोठी आवड होती. काही वर्षांपूर्वीच त्यांची सैन्यदलात निवड झाली होती. ते देशसेवा करत होते. मात्र वयाच्या 29 व्या वर्षी त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गावाला चटका लावला आहे.
भुजबळांकडून श्रंद्धाजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी श्रंद्धाजली व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.