इंडियन प्रीमियर लीग च्या १५ व्या हंगामातील दुसरा सामना रविवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. एकेकाळी मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सामन्याचे फासे फिरवले. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो जयंत यादव. त्याने दिल्लीचा डाव ६ बाद १०४ धावांपासून सावरला. त्याने नाबाद ४८ धावांची खेळी करत दिल्लीला विजयीपथावर नेले. त्याला १७ चेंडूत ३८ धावांची खेळी करणारा अक्षर पटेलने मोलाची आणि आक्रमक साथ दिली.
त्याआधी बेसल थंम्पीने आपला प्रभावी मारा सुरूच ठेवत दिल्लीची जमू पाहणारी जोडी फोडली. त्याने शार्दुल ठाकूरची ११ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने केलेली २२ धावांची खेळी संपवली. दिल्लीला शतक पार केल्यानंतर सहावा धक्का दिला.
रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल स्पर्धेतील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. डबल हेडरच्या पहिल्या दिवसातील दुपारच्या सत्रातील लढत ही ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगली आहे. या मैदानात रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितच्या संघाने दिल्लीसमोर १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
दिल्ली विरूद्धच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पैसा वसूल झाला. तब्बल १५.२५ कोटींची रक्कम देऊन विकत घेतलेल्या इशान किशनने संपूर्ण २० षटकं खेळत धडाकेबाज ८१ धावांची खेळी केली. रोहित शर्माने दमदार सुरूवात केली होती, पण तो बाद झाल्यावर इशान किशनने जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत तुफान फटकेबाजी केली. त्याच्या खेळीमुळेच मुंबईने २० षटकात ५ बाद १७७ पर्यंत मजल मारली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी सलामीवीर इशान किशन या दोघांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. पॉवर प्ले संपेपर्यंत त्यांनी अर्धशतकी मजल मारली. रोहित वेगाने फलंदाजी करत असताना ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला. अनमोलप्रीत सिंग (८) स्वस्तात बाद झाला. एन तिलक वर्माने ३ चौकार मारले पण तो २२ धावांवर माघारी परतला.
मुंबईचा सर्वात अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्डने चाहत्यांची निराशा केली. त्याने ६ चेंडूत केवळ ३ धावा केल्या आणि झेलबाद झाला. हार्दिक पांड्याच्या जागी फिनिशरची भूमिका दिली गेलेला टीम डेव्हिडदेखील फारसा प्रभाव पाडू शकला नाही. पण इशान किशनने मात्र नाबाद ८१ धावा कुटल्या.