मुंबई2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंनी नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली, आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, ठाकरेंची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली.
मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, पुनम महाजन, मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय, अमित साटम, योगेश सागर, सुनील राणे, पराग अळवणी, कालिदास कोळंबकर, मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर, राजहंस सिंह, कॅप्टन तमिळ सेल्वन, जयप्रकाश ठाकूर, चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, गटनेते प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वमान्यता
मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकाचे ऐका मन की बात लोगो की सूनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात मुंबई शहरात दहा हजार ठिकाणी ऐकली गेली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रवास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. आमचं अन्य पक्षांना आव्हान आहे की, भाजपाच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला दहा हजार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले. गरजू महिलांना तसेच २७ हजार कुटुंबांना मदत करण्यात आली.सलग १५ दिवसात ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. टीका करणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक टीकेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत.
आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत आणि म्हणून कर्नाटकचे निकाल लागले त्यानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले. हे खर आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला सत्ता मिळाली नाही. हेही विनम्रतेने सांगू आणि त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचं कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही मतदाराने दिलेल्या कौलाचा संपूर्ण विनम्रतेने स्वीकार करून त्याचे विश्लेषण करू. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईल. पोपटपंची करणारे पोपट बोलायला लागल्यावर मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली.
त्याठिकाणी एक हजाराच्या खाली जागा गेल्या अशा पाच जागा आहेत. तीन जागा अशा आहेत ज्या दोन हजार मतांनी गेल्या, बावीस जागा अशा आहेत ज्या पाच हजाराच्या आत अंतराने गेल्या आहेत. सहा सात हजाराच्या अंतराने गेल्या अशा सोळा जागा आहेत, या सगळ्याची गोळा बेरीज केली तर ४७ होते. या ४५ जागा इथून तिथे झाल्या असत्या तर ८५ वर काँग्रेस आणि ११० वर भाजपा गेली असती. आम्हाला पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू.
बंगरुळूमध्ये पूर्वी असलेल्या १५ जागा वाढवून आता त्या १६ जागा झाल्या आहेत. केवळ जागा नाही वाढल्या तर २०१४ मध्ये ३४.११ टक्के मते होती यामध्ये वाढ होऊन आता ही मते ४२.११ यात म्हणजेच साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई भाजपा कार्यकर्त्यानी ठरवलं मुंबईत ३२ वरून ८२ जागा आणतो. पटेल आंदोलनाचे पीक असतानाही संपूर्ण जागा निवडून आणतो. याखेरीज बेंगलोरमध्येही आपली ताकद दाखवून देतो. ही भाजपची ताकद आहे. मी, प्रसारमाध्यमांना आवाहन करतो की, याची सत्यता तुम्हीच पडताळून पहा असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
समाजविघातक कृत्य सहन करणार नाही
यावेळी आशिष शेलार यांनी समाज माध्यमांवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ दाखवून याबाबतची सत्यता मीडियाने पडताळून पाहावी असे स्पष्ट केले. भाजप पराभूत झाले. यश मिळाले नाही तर नंगानाच आणि त्याबरोबर समाजविदारक कृत्यांची व्हिडिओ क्लिप कशी काढली जाते त्याचा आनंद कर्नाटकात साजरा केला. भाजपच्या झेंड्यावर गाय कशी कापली हे दाखविण्यात येत आहे. गाय कापून भाजपच्या झेंड्यावर तुम्ही उन्माद साजरा करणार असाल तर आणि त्या काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे तुम्ही बसणार असाल तर तुमचा निषेध करावा तेवढा कमी आहे.
…म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले
१९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला.
राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता, आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की … उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडणुकीत पन्नास चा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपल म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे… पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आशिष शेलार म्हणाले.