अमरावती22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कोणत्या जन्मातले हे ऋण आहे, ऐनवेळी एकटे सोडीत नाही, एवढा दु:खातही सदगुण आहे, असे सांगणारा कवी धनंजय तांदळे पुढे थेट रोमँटीक होऊन, तुझ्या माझ्यामधे काहीतरी आहे, मलाही वाटते अफवा बरी आहे असे सांगत उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतो. हा प्रसंग अलिकडेच अमरावतीकरांनी अनुभवला.
गझलकार चंद्रशेखर भुयार यांच्या “समाधी” या गझल संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त गझल वैदर्भीद्वारा आयोजित मराठी गझलेचा महामुशायरा दमदार गझलकार, उत्तम गझल प्रस्तुती व विविध विषयांवरील चिंतनशिल, भावपूर्ण व परिस्थितीजन्य शेरांमुळे खुमासदार ठरला.
”कोण आहे मी कसा आहे, काय याचा भरवसा आहे
हे पुढे ठरवेल ही दुनिया, मी हीरा की कोळसा आहे”
या नितीन देशमुखांच्या गझलेने मुशाय-याचा दमदार प्रारंभ झाला. तर मसूद पटेल यांनी
”शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही
मित्रांमधेच वाटप झालो शत्रूंसाठी उरलो नाही”
ही गझल आपल्या विशेष शैलीत सादर करुन टाळ्या घेतल्या.
जीवनाकडे स्थैर्याची मागणी करताना प्रिती वाडीभस्मे यांच्या या चार ओळी भावपुर्ण ठरल्या.
”जीवना दे स्थैर्य मज, वणवण नको, धावण्याचे फालतू कारण नको
पामराला पायरीशी स्थान दे, विठ्ठला कुठलेच मोठेपण नको.”
या गझलेनंतर आजच्या मानवी वृत्तीला अधोरेखीत करणा-या महेन महाजन यांच्या
”गोष्ट आहे तशी ख-याची, पण खरी नाही, घरातून सांगतो मी की मी घरी नाही.”
या शेराने दाद घेतली. तर गोपाल मापारी यांनी चक्क ईश्वरालाच धीर देत
”भक्त येतील तू धीर सोडू नको,
ईश्वरा तू मंदिर सोडू नको”
या दोन ओळी अंतर्मुख करुन गेल्या. जाती व्यवस्थेवर भाष्य करताना मापारी म्हणाले,
”सोडावयास जाती कोणी तयार नव्हते,
इतके पुढारलेले अमुचे विचार नव्हते.”
सुनील ठाकुर यांनी मुशाय-यात गुलाबी रंग भरताना
”सूर तू ताल तू नवनवी चाल तू,
धुंद हा गारवा मखमली शाल तू”
ही गझल तरन्नूममधे सादर करुन वाहवा घेतली.
नगरचे युवा गझलकार धनंजय तांदळे यांनी एकाहून एक रचना सादर करुन आपल्या प्रतिभेचा परिचय करुन दिला. फक्त माझ्या सावलीवर ऊन आहे. पण पुढे गंभीर होताना झुडूप बोलते मलाच हल्ली विझवायची भाषा, कालच तर या मांडीवरती निजून गेले वादळ, असे म्हणताच रसीकांनी भरभरुन दाद दिली.