मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
धमक्या, दबावाचा माझ्यावर कोणातही परिणाम होणार नाही. दबावाखाली येऊन मी कधी निर्णय घेत नाही. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून संविधानाने मला जे अधिकार दिले आहेत, त्याचे पालन करेन, असे म्हणत राहुल नार्वेकरांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. त्यावरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जुंपली आहे.
लक्ष देत नाही
राहुल नार्वेकर म्हणाले की, संजय राऊतांकडे मी लक्ष देत नाही. त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. जर का कोणाला असे वाटत असेल की, अशा टीका करून, धमक्या देऊन फिरू न द्यायच्या गोष्टी करून. माझ्यावर परिणाम होणार असेल, माझ्यावर दबाव येणार असेल, तर तो त्यांचा सर्वात मोठा गैरसमज असेल. मी कुठल्याही दबावाखाली येऊन कधी निर्णय घेत नाही.
घटनेचे पालन होणार
राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून संविधानाने मला जे अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा घटनात्मकरित्या वापर करून मी निश्चितपणे या प्रकरणात न्याय द्यायचा प्रयत्न करेन. शक्य तितक्या लवकर हे प्रकरण निकाली काढू. दिरंगाई होणार नाही. नियमांच्या आधारावर संविधानाच्या तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय होईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
राऊतांची जहरी टीका
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, राहुल नार्वेकर कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्ष शिवसेनेचेच वकील होते. शिवसेनेच्या माध्यमातूनच त्यांचे राजकारण पुढे गेले. त्यांना शिवसेना काय आहे हे माहिती आहे. काय घडले आहे, कसे घडवले, हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर त्यांनी त्यांची कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवावी, अशी जहरी टीका त्यांनी केली होती.
संबंधित वृत्तः