अतुल पेठकर | नागपूर22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
- २०१३ ते २०२२ या दहा वर्षांत झाले साडेपंधरा हजार अवयव प्रत्यारोपण
मृत्यू पश्चात किंवा जिवंतपणी अवयवदान केल्यास आपण इतरांचे जीवन सुसाह्य करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे यासाठी अवयव प्रत्यारोपण समिती सातत्याने प्रयत्न करीत असते. समितीच्या प्रयत्नांना चांगले यश येत असून २०१३ ते २०२२ या दहा वर्षात अवयव प्रत्यारोपणात वाढ झाल्याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे सचिव डाॅ. राहुल सक्सेना यांनी दिली. “लाईव्ह डाेनर’ म्हणजे जिवंतपणी दात्यांनी दान केलेल्या अवयव प्रत्यारोपणात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमाकांवर आहे. दिल्ली एनसीआर ३६२३ प्रथम, तामीळनाडु १६९१ ने द्वितीय आणि महाराष्ट्र १२११ ने तृतीय स्थानी आहे. केरळ ९७९ ने चौथ्या तर ९२८ ने पश्चिम बंेगाल पाचव्या क्रमाकांवर आहे
२०२२ मध्ये ९०४ मेंदू मृतकांच्या अवयवदानामुळे २७६५ प्रत्यारोपण, फुप्फुस-यकृताच्या दानाचे प्रमाण चांगले
मेंदू मृत रुग्णांचे अवयवदान वाढले
मेंदू मृत रुग्णाचे अवयवदान केले जाते. २०१३ मध्ये ८३७ मेंदू मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी संमती दिल्यानंतर त्यांचे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते. १० वर्षांत ते २०२२ मध्ये २७६५ इतके वाढले. प्रारंभी २०१३ मध्ये अवयवदाते केवळ ३४० होते. सततच्या प्रयत्नाने २०१६ पासून ते वाढत गेले. २०१६ मध्ये ९३० मेंदू मृतकांच्या अवयवदानामुळे २२६५ अवयव प्रत्यारोपण होऊ शकले. प्रति अवयवदाता प्रत्यारोपणाचे प्रमाण २.४३%इतके होते. २०२२ मध्ये ९०४ मेंदू मृतकांच्या अवयवदानामुळे २७६५ अवयव प्रत्यारोपण होऊ शकले. प्रति अवयवदाता प्रत्यारोपणाचे प्रमाण ३.०५%इतके होते.
२ लाख नागरिक अवयवदानाच्या प्रतीक्षेत
भारतात किडनी व यकृताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. २ लाख नागरिक किडनी आणि यकृत अवयवदानाचा प्रतीक्षेत आहे. त्यापैकी ४ हजार ८०० रुग्णांना किडनी तर ५०० लोकांना यकृताव्दारे अवयदान मिळाले आहे. ३० लाख लोकांना अंधत्व आजार आहे. हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, स्वादुपिंड या अवयवांचे दान केवळ ब्रेन डेथ झाल्यानंतर करता येते. कॉर्निया डोळयातील बुबुळांच्या वरील गोलाकार, त्वचा, हृदयाची झडप, अस्थि, स्नायुबंध इत्यादी ऊतीचे दान हृदयक्रिया बंद पडून मृत्यू आल्यानंतर करता येते, असे मेयाे हाॅस्पीटलच्या बधिरीकरण शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. वैशाली शेलगावकर यांनी सांगितले.
२०२२ मधील प्रमाण सर्वाधिक
अनेकदा रुग्णाची बहीण, आई, भाऊ, मित्र किंवा नातेवाईक अर्थात जिवंत दाते अवयव दान करतात. २०१३ मध्ये राज्यात असे केवळ ४१५३ प्रत्यारोपण झाले. तर २०२२ मध्ये १२,७९१ इतके होते. २०१४ मध्ये ५८८६, २०१५ -६६८९, २०१६ -६७५६, २०१७ -७४२९, २०१८ -८०८५, २०१९ -१०,६०४, २०२० -६४५७ तर २०२१ मध्ये १०,६३८ जिवंत दात्यांनी दिलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे.
ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदान सर्वाधिक
२०१३ मध्ये राज्यात ब्रेन डेड व्यक्तींच्या ४९९० अवयवांचे प्रत्यारोपण झाले. तर २०२२ मध्ये ही संख्या १५,५६१ होती. २०१४ मध्ये ६९१६, २०१५ -८३४८, २०१६ -९०२२, २०१७ -९५३९, २०१८ -१०,३४०, २०१९ -१२,६६६, २०२० -७४४३, २०२१ मध्ये १२२५९ अवयव प्रत्यारोपणाची नोंद आहे. अवयव दान जागृती मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही सकारात्मक वाढ होत असल्याचे दिसून आले.
१० वर्षांत ९८३४ मूत्रपिंड प्रत्यारोपण
या दहा वर्षात मेंदू मृत रुग्णांच्या अवयवदानामुळे १५८९ तर जिवंत दात्यांच्या अवयवदानामुळे ९८३४ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. याचप्रमाणे मेंदू मृतकाच्या अवयवदानामुळे ७६१ यकृत तर जीवंत दात्यांच्या अवयवदानामुळे २९५७ यकृत प्रत्यारोपण झाले. २०१३ मध्ये ३० हृदय प्रत्यारोपण झाले. २०२२ मध्ये ते २५० झाले. २०१३ मध्ये २३ फुफ्फुस प्रत्यारोपण झाले. २०२२ मध्ये ते १३८ इतके झाले.
किमान आठ जीवदान
ब्रेन डेड झाल्यानंतर माणसाला धार्मिक प्रथेप्रमाणे दहन केले जाते वा दफन केले जाते. पण, तत्पूर्वी त्याचे अवयवदान केले तर किमान आठ जणांना नवे जीवन मिळते. त्यांच्यात जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. भारतात दर दिवसाला ६ हजार लोकांचा मुत्यू हा अवयव न मिळाल्यामुळे होतो. अशांचे जीवन वाचावे म्हणून प्रत्येकाने अवयव दान संमतीपत्र भरले पाहिजे. – डाॅ. राहुल सक्सेना, सचिव विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, नागपूर