छत्रपती संभाजीनगर30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्य सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. मराठवाड्यात आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा करणे अपेक्षीत होते. तर सरकार नामांतराचा मुद्दा पुढे करत आहे. वास्तविक नामांतराचा मुद्दा कोर्टात आहे. मग घोषणा कशी केली? असा सवाल करत खासदार इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. इथे येण्याचा तुमचा उद्देश काय आहे, ते सांगा. तुम्ही नाव बदलले, तर मग आश्वासन द्या की, एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही, युवकांना रोजगार देऊ. केवळ लोकांना वेड्यात काढण्यासाठी मंत्रिमंडळ शहरात आले असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराला खासदार इम्तियाज जलील यांनी या आधी देखील विरोध केला होता. या विरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. या याचिकेबाबत सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने आक्षेपांवर अद्याप सुनावणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्या नंतर अचानक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवस आधी तसेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी राज्य सरकारने राजपत्र प्रकाशित केले आहे.
वास्तविक काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. शिवाय ग्रामीणला छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आले नव्हते. आज याबाबत घोषणा करण्यात आली. आज पुन्हा एकदा नामांतरासंदर्भात नोटीफिकेशन काढण्यात आले. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
निवडणुका समोर ठेवत घोषणा – जलील
केवळ निवडणुकासमोर ठेवून गाजर दाखवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये मुख्यमंत्री असताना काही घोषणा केल्या होत्या. हेच लोक तेव्हा सत्तेत होते. त्यावेळी घोषणा केलेली कामे अजुनही सुरू झाली नसल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. सरकारचा एकच उद्देश आहे की, शहरामध्ये निवडणुकीला कसा फायदा होईल, असा आरोपही जलील यांनी केला.
खासदार इम्तियाज जलील यांच्या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…
खासदार जलील यांच्या नेतृत्त्वात आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांनी बॅरीकेट्स तोडले:पोलिसांनी लाठीने मारल्याचा महिला मोर्चेकरांचा आरोप
छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांचा मोर्चा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चात सहभागी महिलांनी बॅरिकेट्स तोडून मंत्रिमंडळाची बैठक सुरू असलेल्या सभागृहाकडे कूच केली. या वेळी आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच रेटारेटी झाली. इतकेच नाही तर पोलिसांनी आम्हाला लाठीने मारले असल्याचा आरोप मोर्चात सहभागी महिलांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…