आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जची इतकी खराब अवस्था कधीच झाली नव्हती. चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नईने आयपीएलच्या १५व्या हंगामातील सलग सुरुवातीच्या चार लढती गमावल्या आहेत. संघावर स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका निर्माण झालाय. संघाचे फलंदाज ना गोलंदाज चॅम्पियन प्रमाणे खेळत आहेत. अशाच चेन्नईला निश्चितपणे काही नवा प्रयोग करावा लागले. यासाठी स्टार क्रिकेटपटूने एक नवी आयडिया दिली आहे. आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपर किंग्ज संघाबाबत कधीच न झालेली घटना यावेळी घडली आहे. त्यांनी सुरुवातीच्या चार लढती गमावल्या आहेत. यावर भारताच्या माजी क्रिकेटपटूने एक उपाय सुचवला आहे.
माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेला विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलच्या मते महेंद्र सिंह धोनीने सलामीला फलंदाजीला यावे. चेन्नईच्या या माजी कर्णधाराने डावाची सुरूवात करावी. जर तो १४-१५ षटकापर्यंत मैदानावर टीकला तर मोठी धावसंख्या सहज उभी करता येईल. धोनी असा खेळाडू आहे ज्याने इतकी वर्ष चेन्नई सुपर किंग्जला जिवंत ठेवले आहे. धोनीने क्रिकेट करिअरची सुरूवात सलामीवीर म्हणून केली होती. आता करिअरच्या अखेरच्या टप्प्यात तो पुन्हा सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार का? धोनी आता सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतोय आणि त्याला १०-१५ चेंडूत खेळण्यास मिळतात. जर धोनी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आला तर फायदा होईल.
धोनीने चेन्नईसाठी सर्वाधिक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. या क्रमांकावर त्याने ७ डावात एका अर्धशतकासह १८८ धावा केल्या आहेत. पण तो २०११ मध्ये अखेरचा तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. यातील दुसरी बाजू अशी की, धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये कधीच सलामीवीर म्हणून फलंदाजी केली नाही. ना भारतीय संघासाठी ना आयपीएलमध्ये. १७ वर्षापूर्वी धोनीने २००५ साली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात डावाची सुरूवात केली होती. तेव्हा त्याने ७ चेंडूत फक्त २ धावा केल्या होत्या. त्यानंतर २००६ साली इंग्लंडविरुद्ध सलमीवीर म्हणून येताना धोनीने १०६ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या.