मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या लढतीत सुरुवातीच्या २ ओव्हरपर्यंत लाईट नसल्याने चेन्नईला डीआरएस घेता आला नाही. पाहा यावर विरेंद्र सेहवाग काय म्हणाला…आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध करो या मरो लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला. चेन्नईच्या या पराभवाला सर्वात जास्त जबाबदार मानले गेले ते डीआरएसला होय. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा संघ १६ षटकात फक्त ९७ धावांवर बाद झाला. मुंबईने विजयाचे लक्ष्य १४.५ षटकात आणि ५ विकेटच्या बदल्यात पार केले.
सामन्यात सुरुवातीचा काही काळ डीआरएस उपलब्ध नव्हता. लाईट नसल्याने पूर्ण सिस्टम बंद होती आणि तेव्हाच डेवॉन कॉन्वे वादग्रस्त पद्धतीने पायचीत बाद झाला. सिस्टम बंद असल्यामुळे चेन्नईला डीआरएस घेता आला नाही. या संपूर्ण प्रकरणावर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने आयपीएलच्या व्यवस्थापनावर हल्ला चढवला.
सेहवागने डीआरएससाठी जनरेटरचा वापर का गेला नाही असा प्रश्न विचारला. हे धक्कादायक आहे की लाईट नसल्यामुळे डीआरएस घेता आला नाही. इतकी मोठी लीग आणि एक जनरेटरचा वापर केला गेला नाही. जे काही सॉफ्टवेअर होते, ते बॅकअपच्या माध्यमातून लाईटवर चालवता आले असते. हा बीसीसीआयसाठी देखील एक मोठा प्रश्न आहे, असे सेहवाग म्हणाला.
क्रिकबजवर बोलताना तो म्हणाला, जर लाईट गेली तर काय होणार? जनरेटर फक्त स्टेडियमच्या लाईटसाठी आहे ही व्यवस्था ब्रॉडकास्टर्स आणि त्याच्या सिस्टमसाठी नाही का? जर मॅच सुरू होती तर डीआरएसचा वापर केलाच पाहिजे होता किंवा डीआरएसचा वापर संपूर्ण सामन्यात करायला नको होता. जर मुंबईत प्रथम फलंदाजी करत असती तर त्यांचे नुकसान झाले असते.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज डेनियल सॅम्सने १६ धावात ३ विकेट घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नईचा फक्त ९७ धावांवर ऑलआउट झाला. सॅम्ससोबत चेन्नईच्या पराभवाला पॉवरकटने महत्त्वाची भूमिका बजावली. चेन्नईला १.४ ओव्हरपर्यंत डीआरएस घेता आला नाही. सुरुवातीच्या या १० चेंडूत चेन्नईने ३ विकेट गमावल्या. त्यानंतर चेन्नईचा डाव सावरलाच नाही.