अमरावती13 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कु-हा येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या घरापर्यंत जाऊन प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी महाविद्यालयाच्या पक्षीमित्र उपक्रमात त्यांना सहभागी करुन घेतले. या उपक्रमासाठी ‘एक कदम मानवता की और’ या संस्थेनेही मोठा हातभार लावला.
दरम्यान प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते दीडशेहून अधिक नागरिकांना जलपात्रांचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातर्फे विविध गावांमध्ये सभा-बैठकी घेण्यात आल्या. यावेळी प्राचार्य. डॉ. अरविंद देशमुख असे म्हणाले की, आता पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे. सृष्टीच्या समतोलासाठी मुंगीपासून ते वाघापर्यंत सर्वच प्राणीमात्रांची सृष्टीला गरज आहे. अशा परिस्थितीत पूर्वीच्या काळात दिसणारे पक्षांचे थवेच्या थवे आता नामशेष झाले आहे. चिमणी, कावळे दिसेनासे झाली आहेत. शिवाय उन्हाळा खूप तीव्रतेने आग ओकतो आहे. जंगलातदेखील पाण्याची गरज आहे. त्यामुळे मुके पक्षी पाण्यावाचून तडफडून मरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणूनच आपण सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या कडक उन्हाळ्यामध्ये आपापल्या घरात, बागेत, शेतामध्ये महाविद्यालयाच्यावतीने आपल्याला प्राप्त हे जलपात्र ठेवावे. त्या ठिकाणी रोज स्वच्छ ताज्या पाण्याची व्यवस्था करावी. बाजूला शक्य असेल तर त्यांना चारा म्हणून धान्याची काही दाणी टाकावीत. या माध्यमातून आपण या पक्षांसाठी मित्र म्हणून काम करू शकतो आणि पर्यावरणाचा समतोल राखू शकतो. म्हणजे आपण पृथ्वीचे बिघडत चाललेले आरोग्य, ग्लोबल वॉर्मिंग यापासूनदेखील स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.
प्राचार्य डॉ. देशमुख यांच्या या संबोधनानंतर अनेक गावांतील नागरिक त्या उपक्रमात सहभागी झाले. अशाप्रकारे सर्वांनी अत्यंत मन:पूर्वक गाडगे बाबा यांच्या दशसुत्रीतील ‘मुक्या प्राण्यांना अभय’ या सुत्राचा आदर करीत राष्ट्रीय कार्यात सहभाग दर्शविला. ‘एक कदम मानवता की ओर’ या संस्थेचे पदाधिकारी अजय बत्रा व महेश मुलचंदाणी यांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. शिवाय महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि कुऱ्हा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संगीता पवार, बचत गटात काम करणाऱ्या विविध महिला, गावातील मुले, ग्रामस्थ .यांनीही या मोहिमेत महत्वाचा वाटा उचलला.
पहिल्याच दिवशी दीडशेवर जलपात्रांचे वितरण
या उपक्रमांतर्गत पहिल्याच दिवशी दीडशेवर जलपात्रांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे १५० ग्रामस्थांनी जलपात्रांचा स्वीकार करुन ते तत्काळ उपयोगात आणले. या उपक्रमासाठी प्राचार्य. डॉ. अरविंद देशमुख यांच्यासह ‘एक कदम मानवता की ओर’ या संस्थेचे पदाधिकारी अजय बत्रा व महेश मूलचंदानी यांचे आभारही मानले.