अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
संशय घेवून वारंवार मुलाला त्रास देत असल्याचा आरोप करुन एका 55 वर्षीय वडीलाचा 22 वर्षीय मुलाने दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दारापूर येथे शुक्रवारी (दि. 17) रात्री समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी सदर मृतकाने आत्महत्या केली, असा बनाव करण्यात आला होता.
संजय वासुदेवराव ईसळ (55, रा. दारापूर) असे मृतकाचे तर गौरव संजयराव ईसळ (22, रा. दारापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकरी मुलाचे नाव आहे. संजय ईसळ यांचा मृतदेह 15 मार्चला सकाळी घरातच आढळला होता. त्यावेळी पोलिसांना माहीती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचले असता संजय ईसळ यांच्या अंगावर विष सांडलेले होते तसेच विषाचा दुर्गंधसुध्दा त्या ठिकाणी येत होता. त्यामुळे त्यांनी विष घेवून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते.
त्यामुळे खोलापूर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. त्यावेळी डॉक्टरांनी हा मृत्यू विषबाधेने नसून गळा आवळल्याने झाला असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पोलिसांनासुध्दा पंचनामादरम्यान हा खुन असल्याचा अंदाज आला होता. त्यामुळेच खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत यांनी शुक्रवारी रात्री संजय यांचा मुलगा गौरव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने सांगितले कि, वडील हे वारंवार संशय घेत होते. त्यामधून अनेकदा वाद झाले होते.
घटनेच्या दिवशी म्हणजेच 14मार्चला रात्रीसुध्दा वाद झाला. त्या वादानंतर रागातून दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला व सदर मृत्यू आत्महत्या वाटावी, म्हणून अंगावर विषारी द्रव्य टाकले. हा प्रकार समोर येताच गौरवला तत्काळ अटक केली असल्याचे खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत यांनी सांगितले आहे.