अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
प्रभारी कुलगुरुंच्या आधारे सुरु असलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कारभार नियमित व्हावा म्हणून कायमस्वरुपी कुलगुरुंची निवड होणे आवश्यक आहे. परंतु विद्वत परिषदेचे रितसर गठन न झाल्यामुळे नव्या कुलगुरुंच्या निवडीला ब्रेक लागला आहे.
सध्या विद्वत परिषदेच्या गठनाची प्रक्रिया अंतीम टप्प्यात पोहोचली असून लवकरच या परिषदेचे गठन अधिकृतरित्या केले जाईल. त्यामुळे आपोआपच कुलगुुरु निवड प्रक्रियेलाही गती मिळेल, असे विद्यापीठ सूत्रांचे म्हणणे आहे.
कुलगुरूंच्या निवडीतील टप्पे
- कुलगुरु निवड प्रक्रियेतील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार सर्वात पहिला टप्पा हा विद्वत व व्यवस्थापन परिषदेने निवडावयाच्या प्रतिनिधीचा आहे.
- हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच शिक्षण क्षेत्रातील नामवंत पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती नेमली जाते.
- ही समिती पुढे कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रकाशित करुन पात्रतेनुसार, अर्ज मागवते.
- त्यानंतर प्रत्यक्ष संपर्काअंती आलेल्या अर्जातून योग्य वाटणाऱ्या पाच जणांची नावे कुलपती तथा राज्यपाल यांच्या कार्यालयाला कळविली जातात.
- अखेरच्या टप्प्यात राज्यपाल पाच जणांशी मुलाखतरुपी चर्चा करुन एका नावावर शिक्कामोर्तब करतात.
सध्या प्रभारीवर कार्यभार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुचा पदभार संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे आहे. यापूर्वी नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. दिलीप मालखेडे हे या विद्यापीठाचे कुलगुरु होते. पण त्यांचे निधन झाल्यानंतर डॉ. येवले यांच्याकडे कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
डॉ. मालखेडे यांची निवड होण्यापूर्वीही काही काळ हे पद रिक्त होते. त्यावेळी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. अकोला हे अमरावतीपासून जवळ असल्याने ते आठवड्यातील निम्मे दिवस अमरावती विद्यापीठाला देत होते. ही बाब डॉ. येवले यांच्याबाबत लागू पडत नाही. त्यांना थेट ५०० किमी अंतरावरुन येथे यावे लागते. दरम्यान कुलगुरु पूर्णवेळ उपस्थित न राहू शकल्याने ज्या अडचणी निर्माण होतात, तशा अडचणींचा सामना सध्या विद्यापीठाला करावा लागत आहे.
चौकट—-
लवकरच नेमला जाणार प्रतिनिधी
विद्वत परिषदेचे गठन न झाल्यामुळे व्यवस्थापन व विद्वत परिषदेची संयुक्त बैठक अद्याप व्हायची आहे. या संयुक्त बैठकीतच विद्यापीठ प्रतिनिधीची निवड केली जाते आणि हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु होते. विद्यापीठ सूत्रांच्या मते येत्या काळात विद्वत परिषद पुर्णत: गठित केली जाणार असूनव्यवस्थापन परिषदेसोबत बैठक घेतली जाईल.
—————————————-