अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
शंभर कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला राहुरी सोनई रस्त्याची अल्पवधीत वाट लागली असून अनेक निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जाणार हा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावरील उंबरे येथे गुरुवारी सकाळी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात ते बोलत होते. आमदार तनपुरे म्हणाले, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या राहुरी-सोनई रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे अपघाताच्या घटनांना कारणीभूत ठरले.
शिर्डीचे साईबाबा व शिंगणापूर येथील शनी महाराज देवस्थान या जागतिक ख्याती असलेल्या दोन देवस्थानाला जोडल्या जाणाऱ्या राहुरी-शिंगणापूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने आजपर्यंत अपघाताच्या घटनात वीस ते पंचवीस नागरिकांचा हकनाक बळी गेला.
सध्याचे शासनकर्ते याबाबत ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्यामुळे ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. राहुरी ते सोनई पर्यंत २० ठिकाणी गतिरोधक बसवून उर्वरित काम एका महिन्यात सुरू करणार, असे लेखी आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिल्याने रस्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सचिन भिंगारदे, बाळासाहेब लटके, गोरक्षनाथ दुशिंग, सुनील अडसुरे, साहेबराव दुशिंग, माणिकराव तारडे, भारत तारडे, संदीप दुशिंग, सुरेश साबळे, कारभारी ढोकणे, शहाराम आलवणे, लक्ष्मण काळे, दत्तात्रय ढोकणे, सुरेश ढोकणे, संजय ढोकणे, भाऊराव कवडे, साहेबराव गायकवाड, ऋषिकेश माळवदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.