अकोला31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
डाळिंबाची येथील घाऊक फळ बाजारात आवक घटल्याने डाळिंबाच्या दरात मागील महिनाभराच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी शंभर रुपये किलो असलेल्या डाळिंबासाठी ग्राहकांना आता किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय आवकही नियमित नसल्याने शहरातील फळ विक्रेत्यांकडे दुपारनंतर तुटवडा जाणवत आहे.
अकोला शहरातील जनता फळ बाजारामध्ये साधारणत: महिनाभरापूर्वी दररोज २०० ते २५० क्रेट डाळिंबाची आवक बाहेरील जिल्ह्यातून होत होती. ती आता १०० क्रेटवर आली आहे, अशी माहिती शहरातील प्रमुख डाळिंब विक्रेत्या व्यापाऱ्यांनी दिली. तूर्त बाजारातील तसेच शहराच्या विविध चौकातील फळ विक्रेत्यांकडे क्वचितच डाळिंब विक्रीला आल्याचे दिसत आहे. सध्या सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. हातगाड्यांवर फिरुन सफरचंद विक्री करणारेही गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. डाळिंबाचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकजण डाळिंबाला पर्याय म्हणून सफरचंद खरेदी करताना दिसून येत आहेत. आरोग्यदायी असल्याने डाळिंब फळाला चांगली मागणी असते. राज्यातील डाळिंबाला कुवेत, दुबईमध्ये चांगली मागणी आहे.गेल्या काही वर्षात डाळिंब फळ झाडावर तेल्या रोग, खोडकीड आदींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे.
आर्थिकदृष्ट्या खर्च परवडत नसल्याने जालना, देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा परिसरातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागा उपटून फेकल्या आहेत. परिणामी आवक घटली आहे. आवक घटल्याचा परिणाम दरवाढीवर झाल आहे, असे अकोला येथील जनता फळ बाजारातील घाऊक व्यापारी हाजी अफज़ल यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
सफरचंदाची बाजारात आवक
१५ ऑगस्टपासून भारतीय सफरचंदाची बाजारात आवक सुरू झाली. या महिन्यांपासूनही आवक वाढली असून, सफरचंदाचे दरही नियंत्रणात आले आहेत. सध्या घाऊक बाजारात दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल सफरचंदाची आवक होत आहे. सध्या बाजारात राज्यातून तसेच शेजारील सफरचंद उत्पादक प्रांतातून आवक मोठ्या प्रमाणावर आहे आणि दरही ग्राहकाच्या आवाक्यात राहणार असल्याचा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. उत्तम प्रतीच्या सफरचंदाचा दर किलोला शंभर ते दीडशे रुपये असा आहे.
डाळिंब पीक घेणे अवघड
तीन एकर क्षेत्रात गणेश जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. सध्या तोडणी हंगाम सुरू आहे. फळाचा आकार, वजन, रंग यानुसार डाळिंबाच्या फळाला प्रति किलो शंभर ते दीडशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यावर्षी सात ते आठ टन एकरी उत्पादन निघेल. रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब पीक घेणे अवघड झाले आहे.
– अमोल ताथोड, डाळिंब उत्पादक, चिखलगाव