चेन्नईने आयपीएल २०२२मध्ये दिल्लीचा ९१ धावांनी पराभव केला. या विजयामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. जाणून घ्या १० संघाचे प्लेऑफचे समीकरण…चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२मध्ये रविवारी झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा ९१ धावांनी दणदणीत पराभव केला. चेन्नईच्या या विजयामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की खरच चेन्नई टॉप ४ मध्ये पोहोचले का? जाणून घेऊयात नेमके समीकरण काय आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दोन यशस्वी संघ या हंगामात मोठा संघर्ष करताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नईने या वर्षी १० लढतीनंतर गुणतक्त्यात अनुक्रमे १०वे आणि ८वे स्थान मिळवले आहे. स्पर्धेत आतापर्यंत ५५ लढती झाल्या असून साखळी फेरीतील १९ लढती शिल्लक आहेत. स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचून सुद्ध अद्याप एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. अर्थात काही संघांचे चित्र स्पष्ट आहे. पण क्रिकेटमध्ये शेवटच्या लढतीपर्यंत काहीही होऊ शकते.
१) लखनौ सुपर जायंट्स–
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौचा संघ शानदार फॉर्ममध्ये आहे. लखनौने ८ विजयांसह १६ गुण मिळवले असून त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित मानले जाते. पण राहुलचा प्रयत्न असेल की साखळी लढतीत आणखी काही सामने जिंकण्याचा, जेणेकरून संघ टॉप २ मध्ये स्थान मिळवले आणि फायनलमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतील. लखनौचे नेट रनरेट प्लस ०.७०३ इतके आहे.
शिल्लक लढती-
१० मे- गुजरात
१५ मे- राजस्थान
१८ मे- कोलकाता
२) गुजरात टायटन्स–
लखनौ प्रमाणेच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातचे १६ गुण झाले आहेत आणि त्यांचे देखील प्लेऑफमधील स्थान निश्चित आहे. हा संघ पहिल्या दोन स्थानासाठी प्रयत्न करेल. गुजरातने ११ पैकी ८ लढती विजय मिळवला आहे. त्यांचे नेट रनरेट प्लस ०.१२० इतके आहे.
शिल्लक लढती-
१० मे- लखनौ
१५ मे- चेन्नई
१८ मे- बेंगळुरू
३) राजस्थान रॉयल्स–
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान एक मॅच जिंकावी लागले. आता त्यांचे ११ पैकी ७ विजयासह १४ गुण झाले आहेत. राजस्थानचे नेट रनरेट प्लस ०.३२६ इतके आहे.
शिल्लक लढती-
११ मे- दिल्ली
१५ मे- लखनौ
२० मे- चेन्नई
४) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू–
बेंगळुरूने पराभवानंतर कमबॅक केले आहे. पण त्यांचे नेट रनरेट वजा (-०.११५) आहे. १२ लढतीत ७ विजयासह आरसीबीचे १४ गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना रनरेट चांगले करावे लागले आणि किमान एक विजय तरी मिळवावा लागले.
शिल्लक लढती-
१३ मे- पंजाब
१९ मे- गुजरात
५) दिल्ली कॅपिटल्स–
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यात जमा आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. दिल्लीने ११ पैकी फक्त ५ लढती जिंकल्या आहेत आणि त्यांचे नेट रनरेट प्लस ०.१५० इतके आहे.
शिल्लक लढती-
११ मे- राजस्थान
१६ मे- पंजाब
२१ मे- मुंबई
६)सनरायझर्स हैदराबाद–
केन विलियमनसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादला बेंगळुरूविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. मोठ्या पराभवानंतर त्यांचे नेट रनरेट देखील वजा (-०.०३१ ) झाले आहे. आता शिल्लक ३ लढती जिंकल्या तर प्लेऑफचे तिकीट मिळू शकते.
शिल्लक लढती-
१४ मे- कोलकाता
१७ मे- मुंबई
२२ मे- पंजाब
७)पंजाब किंग्ज–
मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबला शनिवारी हंगामातील सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे नेट रनरेट देखील वजा झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना उर्वरित सर्व लढती फक्त जिंकाव्या लागणार नाहीत तर रनरेट देखील चांगले करावे लागले.
शिल्लक लढती-
१३ मे- बेंगळुरू
१६ मे- दिल्ली
२२ मे- हैदराबाद
८)चेन्नई सुपर किंग्ज–
धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शिल्लक ३ लढती मोठ्या अंतराने जिंकाव्या लागतील. त्याचे ८ गुण असून दुसऱ्या बाजूला ४ असे संघ आहेत ज्यांचे १४ पेक्षा अधिक गुण आहेत. त्यामुळे नेट रनरेट चांगले असेल तर चेन्नईला संधी मिळेल.
शिल्लक लढती-
१२ मे- मुंबई
१५ मे- गुजरात
२० मे- राजस्थान
९)कोलकाता नाईट रायडर्स–
चेन्नई सारखीच केकेआरची अवस्था आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा ११ पैकी ७ सामन्यात पराभव झालाय. नेट रनरेट तर वजा आहेच त्यामुळे एखादा चमत्कार त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो.
शिल्लक लढती-
०९ मे- मुंबई
१४ मे- हैदराबाद
२८ मे- लखनौ
१०)मुंबई इंडियन्स–
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या हंगामात सर्वात आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला मुंबईचा संघ सध्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय. शिल्लक लढती जिंकून मुंबई चांगला शेवट करण्याचा प्रयत्न करेल.
शिल्लक लढती-
०९ मे- कोलकाता
१२ मे- चेन्नई
२१ मे- दिल्ली