मुंबई30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मे महिन्याच्या अखेरीसही उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झालेले असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून यंदा वेळेत दाखल होणार आहे. त्यामुळे बळीराजा देखील आता वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे.
स्काकमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून येईल, असे संकेत मिळालेत. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 5 ते 7 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
काही भागात मान्सून पोहचला
नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. पुढील 3-4 दिवसात पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे.
उष्णकटिबंधीय वादळ आले नाही
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होऊन मे महिन्यात पहिले नऊ दिवस ढगाळ वातावरण व जेथे पोषक वातावरण तिथेच पाऊस पडला. यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होता. शिवाय मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत कोणतेही उष्णकटिबंधीय वादळ आले नाही. एप्रिलमध्ये भारताच्या समुद्रात एकही चक्रीवादळ दिसले नाही. एप्रिल महिन्यात उष्णकटिबंधीय वादळ न येण्याचे हे सलग चौथे वर्ष राहिले. त्यामुळे तापमान कमी राहण्याची नोंद झाली.
वातावरणात झालेले बदल पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल
वातावरण सातत्याने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तापमानाबरोबरच वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.