नांदेडएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
सरकारचे गुणगान केले तर बरे, अन्यथा विरोधात बोलले तर लोकांना जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर केला.
नांदेडमध्ये आज संगीत शंकर दरबार सोहळा पार पडला. अशोक चव्हाण सोहळ्याला उपस्थितीत होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भाजवर जोरदार टीका केली.
आजची शोकांतिका
अशोक चव्हाण म्हणाले, आणीबाणीतही जे घडले नाही, अशा घटना सध्या देशात घडत आहेत. सरकारचे गुणगान केले तर बरे. अन्यथा विरोधात बोलले तर काही खरे नाही, अशी परिस्थिती आहे. सरकार विरोधात बोलले तर लोकांना जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत. ही आजची शोकांतिका आहे.
दाभोळकर, कलबुर्गींचे काय झाले?
अशोक चव्हाण म्हणाले, लेखकांना गोळ्या घालण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. नरेंद्र दाभोळकर, काँग्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशी सर्व उदाहरणे आपल्याकडे आहेत. या सुधारकांनी कधी प्राणाची पर्वा केली नाही. पण, त्यांना प्राण गमवावा लागला. त्यांच्या हत्येचा तपास अजूनही सुरू आहे. मात्र, हाती काहीच लागले नाही, अशी नाराजीही चव्हाण यांनी व्यक्त केली.
सरकारचे गुणगान केले तर सन्मान
अशोक चव्हाण म्हणाले, आज देशात वातावरण बदलत आहे. आपण मोकळेपणाने बोलू शकतो का? सरकारचे गुणगान केले तर सगळे चांगले आहे. तुमचा सरकारकडूनच सन्मान केला जाईल. पण, जर विरोधात बोलले तर मात्र काही खरे नाही. विरोधात बोलणाऱ्या लोकांना जीवे मारण्यापर्यंतच्या घटना घडतात.
राजकीय स्वार्थासाठी सामाजिकतेला धोका
अशोक चव्हाण म्हणाले, देशात सध्या भीषण परिस्थिती आहे. मात्र मला खात्री आहे की, साहित्यिक, कवी, पत्रकार निर्भिडपणे बाजू मांडतील. देशात राजकीय स्वार्थासाठी सामाजिक वातावरण खराब केले जात आहे. देशविरोधी धोरण राबवले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याची चर्चा होत आहे. आपण काही बोललो तर आपल्याला देशद्रोही ठरवले जात आहे.
उद्धव ठाकरे दिलदार मुख्यमंत्री
तसेच, आगामी निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवावी, अशी भूमिकाही अशोक चव्हाणांनी मांडली. यासभेत अशोक चव्हाणांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांची प्रशंसा केली. उद्धव ठाकरे एक दिलदार मुख्यमंत्री होते. विकासकामांबाबत त्यांनी नेहमीच सहकार्य केले, असे अशोक चव्हाण म्हणाले.